सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात.
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट बघितला आणि वाटलं तो दिवस दूर नाही जेव्हा मराठी चित्रपट दक्षिणेसारखे तुफान चालतील. रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार आणि धर्मवीर एकाच दिवशी रिलीज झाले पण खरा जोरदार ठरला धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे. मराठी चित्रपटाला गर्दी खेचायचं शास्त्र समजायला लागलंय हे म्हणायला हरकत नाही. आता धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघेंच्या जीवनपटाला न्याय देतोय का याबदल चर्चा करू
सगळ्यात पहिल्यांदा प्रविण तरडे आणि प्रसाद ओक यांचं कौतुक. प्रवीण तरडेने दिघे साहेबांची भूमिका कोण साकारू शकतो या प्रश्नाचं उत्तर प्रसाद ओक मध्ये शोधलं ही निवड एकदम रास्त आहे. चित्रपटात प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत इतका परफेक्ट बसलाय की पडद्यावर ज्या वेळेला दिघे साहेब येतात तेव्हा अंगावर काटाच येतो. नागराज, प्रविण तरडे या नवीन दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळेल यात शंका नाही. चित्रपट बनवताना मास प्रेक्षकांना डोक्यात ठेवून कथानकाची चांगली मांडणी केली आहे. संपूर्ण चित्रपटात कुठेही कंटाळवाणा प्रसंग येत नाही. आनंद दिघेंच्या प्रत्येक एंट्रीला थेटरात शिट्या, टाळ्या वाजत होत्या. सुरुवातीला थोडी शंका होती की फक्त चेहरा दिघे साहेबांचा तयार करून अभिनयात चित्रपट गंडायला नको. पण तसं अजिबात झालं नाही. राग आल्यावर आनंद दिघेंचे चेहऱ्यावरील हावभाव, बोटांची हालचाल हे सगळं इतकं जमून आलंय की प्रसाद ओकचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. सुपर हिरो चित्रपटात ऍक्शन नेहमी अशी असते की हिरोला काही करायची गरजच नसते. धर्मवीर मध्ये चित्रपट प्रत्येक घटनेला वास्तव पद्धतीने तर न्याय देतोच पण त्याचबरोबर मसाला चित्रपटासारखं टाळ्या शिट्या वाजवायला पण संधी देतो. एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने उत्तम साकारली आहे. मुळात आनंद दिघे यांचा जीवनपट अतिशय कुतुहूल आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. प्रवीण तरडेने यासाठी विशेष मेहनत घेतल्याचं चित्रपटात जाणवतं.
दक्षिणेच्या चित्रपटाची शैली एकसारखी असते. हिरो भोवती कथा तयार केली जाते. त्यात चवीनुसार मसाला टाकला जातो त्यामुळे प्रेक्षक डोकं घरी ठेवून आला की चित्रपट चांगला वाटतोच वाटतो. सुदैवाने मराठीत तसं होत नाही. आनंद दिघे यांचं आयुष्य वास्तवात एखाद्या सुपरस्टार हिरोला काय करता यापेक्षा कैकपटीने भारी होतं. त्यामुळे पडद्यावर त्यांचं आयुष्य मांडणं सोपं नाही. प्रविण तरडे आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारून त्याला न्याय दिला आहे. आनंद दिघे हे व्यक्तिमत्व राजकीय असलं तरी त्यांची भूमिका सामाजिक न्यायाची अधिक होती. त्यामुळे दिग्दर्शकांनी राजकीय मते जास्त व्यक्त करून चित्रपट राजकीय केला नाही याबाबदल त्यांचं विशेष आभार. आनंद दिघे हे व्यक्तिमत्व पक्ष संघटना या पुढे जाऊन जनतेसाठी झटणारे होते. आनंद दिघे यांचा जनता दरबार आजच्या सर्व नेत्यांनी अनुकरण करावा असा आहे.
ठाण्यात राहणाऱ्या ज्या पिढीने दिघेंना बघितलं त्यांच्यासाठी हा चित्रपट तर प्रत्येक प्रसंगाला डोळ्यात पाणी आणणारा आहे. काही घटना मनाला चटका लावून जातात. आनंद दिघे यांच्या आयुष्यात रक्ताचं आणि मानलेलं नातं एकच होतं हे राखीने भरलेला त्यांचा हात सांगायचा. ट्रेलर मध्ये हे तुम्ही पाहिलं असेलच. चित्रपटांकडून सामाजिक अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण तरीही चित्रपट संपल्यावर प्रत्येकाला आनंद दिघे यांच्यासारखं सामाजिक काम करावं वाटेल. चित्रपटाच्या सुरुवातीला जाणवलेले धर्मवीर हे चित्रपटाच्या शेवटी अजून व्यापक धर्मवीर वाटतात. आनंद दिघेंचा ‘धर्मवीर’ यापेक्षा उचित सन्मान नाही हे चित्रपट बघितल्यावर कळेल.
खटकलेल्या गोष्टी
प्रसाद ओकची निवड नक्कीच रास्त आहे; पण त्याचबरोबर काही पात्रांची निवड एकदम खटकणारी आहे. बाळासाहेब ठाकरे अजून प्रभावी दाखवता येऊ शकले असते. त्याचबरोबर शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे दाखवले आहेत ते अजिबातही प्रभावी वाटत नाहीत. प्रसाद ओक सोडून इतर पात्रांची भूमिका जास्त वेळ नाही पण तरीही या पात्रांवर अजून काम केलं जाऊ शकतं. पडद्यावर दिघे साहेब येतात तेव्हा जितकं वास्तव वाटतं तेवढे इतर पात्र प्रभावी वाटत नाहीत. आनंद दिघे हे दिघे साहेब कसे झाले हा सुरुवातीचा प्रवास अजून खोलात दाखवला असता तर बरं झालं असतं. काही थोड्याफार त्रुटी असतील पण हा चित्रपट मनोरंजनात कमी पडत नाही त्यामुळे थेटरात जाऊन बघायलाच पाहिजे !
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !