MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय

pakistan-less-tea-economic-crisis-chaai

जग कितीपण टेंशनमध्ये असू द्या पाकिस्तानकडे मनोरंजनाचे लय मटेरियल तयार असतंच. पाकिस्तानमध्ये रोज काही ना काही चालू असतं हे बघून हसावं कि सहानुभूती द्यावी हेच कळत नाही. आता नवीन विषय आला आहे काय तर इथल्या केंद्रीय मंत्र्याने लोकांना चहा कमी प्या असं आवाहन केलंय. नेमका विषय काय आहे थोडा खोलात जाऊन बघू.

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे डबघाईला आलेल्या पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना चहा पिणे कमी करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तान जगातील सर्वाधिक चहा आयात करणारा देश आहे. चहा आयात करण्यासाठी पुरेशी परकीय गंगाजळी पाकिस्तानकडे नाही. घटत चाललेल्या परकीय गंगाजळीतून चहा आयातीसाठी लागणारे शुल्क कमी होण्यास त्यामुळे मदत होईल, असे सांगण्यात आलंय. ‘न्यूज इंटरनॅशनल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षांत ८३.८८ अब्ज रुपये (४० कोटी डॉलर) किमतीचा चहाचे सेवन पाकिस्तानमध्ये केले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाकिस्तानचे केंद्रीय नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांनी देशवासीयांना चहा कमी करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, की जगातील सर्वाधिक चहा आयात करणाऱ्या देशांत पाकिस्तानचा समावेश होतो. तो आयात करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘मी देशवासीयांना असे आवाहन करतो, की दिवसातून एक-दोन कप चहा कमी प्या. कारण आपल्याला कर्ज करून चहा आयात करावा लागतो.’’

ऊर्जा बचतीसाठी आपण व्यापाऱ्यांनाही बाजारपेठ रात्री साडेआठला बंद करण्याचे आवाहन केल्याचे सांगून इक्बाल म्हणाले, की त्यामुळे इंधन आयातीसाठीचे शुल्क कमी करण्यास हातभार लागेल. जर कठोर निर्णय घेऊन ते अमलात आणले नाही, तर पाकिस्तानची अर्थव्यवस्थेची गत श्रीलंकेप्रमाणेच दयनीय होईल, असा इशारा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी दिला आहे. मागच्या काही महिन्यात पाकिस्तनाने अजूनही बऱ्याच वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. यात विशेषतः अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली आहे. पण जाणकारांचे असे म्हणेन आहे कि पाकिस्तानने हे सगळे उपाय खूप उशिरा अमलात आणले आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर पुढचा काळ बिकट असेल.

एहसान इक्बाल यांनी केलेले आवाहन पाकिस्तानी नागरिकांना रुचलेले दिसत नाही. या घटनेमुळे मीमर लोकांना चांगलं मटेरियल मिळालं असेल यात शंका नाही. समाजमाध्यमांद्वारे पाकिस्तानच्या या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे. एका ‘ट्विटर’ वापरकर्त्यांने विचारले आहे, की इक्बाल यांनी खरेच चहा कमी करण्याचे आवाहन केले आहे का? ते आम्हाला मूर्ख समजत आहेत का? इक्बाल करत असलेल्या चहा कमी करण्याच्या आवाहनाला मी प्रतिसाद देणार नाही, असे ‘ट्वीट’ वापरकर्त्यांने केले आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.