दोन माणसाचा स्वयंपाक करायला काय लागतं एवढं ?
बहुतेक घरात ऐकू येणारं हे एक वाक्य स्रीला दिड बाय तीनच्या किचन ओट्यासमोर आयुष्यभर उभं करतं. बोलणारा काय ठरवून बोलतो माहित नाही, पण या वाक्याला न्याय देता-देता तिचं आयुष्य निघून जातं. पुरुषांना घरच्या किचन मधून चचमीत जेवण बनतं एवढंच माहित असतं. पण त्यासाठी घरच्या स्त्रियांना झिजावं लागतं. उठून स्वतःच खरकटं ताट कधी धुतलं नाही तिथे स्त्रीला खरकट्या भांड्यांचा ढिगारा रोज धुवावा लागतो. बेसिन मध्ये ताट ठेवण्याचं उपकार करायला लागला आहे पुरुष आज काल, पण तुंबलेल्या बेसिन मध्ये हात टाकून नाकाची झिंग उतरवायला त्याला जमलं नाही. ‘दि ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा स्रीला घरात दिवसभर काम करावं लागतं फक्त हे सांगण्यासाठी नाही, तर स्त्री-पुरुष भेदभाव कसा समाजमान्य अलिखित नियमांमुळे दृढ झाला आहे, हे सांगतो. त्या नियमांचे वाहक स्त्री आणि पुरुष दोघेही आहेत. स्त्रीला नकार देता येतो ही स्त्रीला कधी जाणीवच करू दिली नाही. पुरुष वरकरणी या व्यवस्थेत नक्कीच लाभार्थी आहे. जातिव्यस्थेसारखी या व्यवस्थेत सुद्धा लाभार्थी वर्ग फारसा भूमिका घेणार नाही, हे आपण बघतच आलो आहोत. काहींच्या मते यात पुरुषाचं सुद्धा नुकसान आहे. असेल कदाचित पण स्त्रीच शोषण आहे, हे आधी मान्य करावं लागेल.
भारतीय कुटुंब व्यवस्थेचं प्रतिबिंब म्हणजे हा सिनेमा.
दि ग्रेट इंडियन किचन हा सिनेमा मुळात हा सिनेमा म्हणावा का हाच प्रश्न आहे. कॅमेरा प्रत्येक घरातली प्रत्यक्ष परिस्थिती टिपतो आहे असं वाटतं. घरात शेमबुड पुसायला नीट जमत नाही अशा लहान मुलापासून ते आता शेमबुड पुसायचं वय नाही हे कळत असून सुद्धा आदेश देऊन घरातल्या स्त्रियांना त्यांच्या तालावर हे लोक नाचवत आले. आपली आई, बहीण, पत्नी पुरुषांच्या आदेशाला प्रमाण मानत आल्या आणि इथून सुरु झाली कामाची वर्गवारी. काम सांगणारा श्रेष्ठ ठरला गेला आणि काम ऐकणारा दुय्यम झाला. सिनेमातला म्हातारा (नायिकेचा सासरा ) हातात ब्रश आणून दिल्याशिवाय दात घासत नाही. चुकून एखाद्या दिवशी ब्रश हातात आणून दिला नाही तर त्याला तो अपमान वाटतो. घरातला स्वतःला कर्ता म्हणणारा पुरुष आवडती भाजी ज्या उत्साहाने विकत घेतो त्या उत्साहात स्वयंपाक बनवायची त्याची हिम्मत होत नाही. आज पर्यंत सासऱ्याने किचन मध्ये पाय ठेवला नाही पण अमुक भाजी अशीच कर हे सांगायला तो विसरत नाही. एवढंच काय तर वॉशिंग मशीन मध्ये कपडे चांगले धुतले जात नाही म्हणून त्याचे कपडे वेगळे धुवायला सुनेला सांगतो. पुरुष सांगायची तसदी घेतोय हेच मोठं काम आहे नाहीतर इतर वेळेस कोणाला काय पाहिजे याचा साक्षात्कार स्त्रियांना आपोआप झाला पाहिजे हि अपेक्षा घरातल्या पुरुषांची असते. हा सिनेमा प्रत्येक तुमच्या आमच्या घरात घडणारी लहान लहान गोष्ट ठळकपणे समोर मांडतो.
कालच्या आणि आजच्या दोन्ही पुरुषांना स्त्रीचं स्थान घरातच पाहिजे.
घराच्या बाहेर शिष्टाचार मिरवणारा पुरुष घरात मात्र मनमानी वागतो. चित्रपटातला नायक विशेष म्हणजे शिक्षक आहे. विद्यार्थाना तो सामाजिक शास्त्र शिकवतो. हॉटेल मध्ये खाताना टेबल मँनर्स पाळतो. कुटुंब स्त्री पुरुष दोघांचं मिळून असतं, यावर शाळेत भाषण देतो. घरी मात्र वर्तणूक एखाद्या मालकासारखी असते. वरकरणी स्त्रीला प्रेम करतोय हे दाखवतोय पण ज्या वेळेस ती सेक्स करताना फोर प्ले बद्दल बोलते, तर हा असुरक्षित होतो. एक स्त्री असं कसं काय बोलू शकते म्हणून नाराज होतो. घराच्या चौंकटीत तो तिचे ऐकतोय हा भास निर्माण करतोय. पण ती जॉब करणार म्हणल्यावर टिपिकल पुरुषी गैरसोय आठवते. जुन्या पिढीच्या सासऱ्याला हे खानदानात बसत नाही असं वाटतं. “घरा बाहेर जायची गरज काय” म्ह्णून खडसावतो. पिढी बदलली तरी कालच्या आणि आजच्या दोन्ही पुरुषांना स्त्रीचं स्थान घरातच पाहिजे.
अय्यपा देवीच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही
मासिक पाळी मध्ये तिला लांब राहावं लागतं. देवीची पूजा म्हणून सगळ्या पासून दूर ठेवलं जातं. अशा वेळेस नवरा गाडीवरून पडतो त्यावेळेस ती उचलायला पळत जाते तर तिचा नवरा तिला दूर ढकलतो. तिचा स्पर्श झाला म्हणून पुजाऱ्याकडून शुद्धीकरण विधी विचारतो. हा प्रसंग शहरी भागात फारसा विशेष वाटणार नाही. पण हीच आजही ग्रामीण वास्तविकता आहे. मासिक पाळी स्त्रियांना अपराधी भावना देऊन जाते. याला जबाबदार कोण मोठा विषय होईल कदाचित पण हे वास्तव स्वीकारायला सिनेमा भाग पाडतो. केरळ मध्ये अय्यपा देवीच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही याबद्दल नायिका फेसबुकवर स्वतःच मत नोंदवते तर जातभाई गॅंग तिला व्हिडिओ डिलीट करायला सांगतात. स्त्रीला तिची मतं नसतात. तिच्यासाठी निर्णय घेणारे ती सोडून सगळे असतात. या सगळ्या प्रक्रियेत तिचं अस्तित्व आजपर्यंत आपण संपवत आलो आहोत.
दि ग्रेट इंडियन किचन हा सिनेमा रोज प्रत्येकाच्या घरी घडत असतो. फरक एवढाच आहे आपल्याला दुसऱ्या कोणी आपलं खरं रूप दाखवल्याशिवाय सत्य दिसत नाही. सिनेमाच्या सगळ्या घटना मी इथे सांगणार नाही. प्रत्येक घटनांचा अर्थ लावला तर सिनेमापेक्षा समीक्षण मोठं होईल. किचन मधल्या घाण पाण्याचा रोज अभिषेक घेणारी स्त्री जेव्हा पुरुषाला त्याच पाण्याने अभिषेक घालेल तेव्हाच तिची वेदना समस्त समाजाला कळेल. ती वेळ येण्या अगोदर आता आपण बदललं पाहिजे. नाहीतर समाजाच्या अर्ध्या लोकसंख्येला फार काळ कोणीच धाकात ठेवू शकणार नाही. तिचं बंड ठरलेलं आहे. रोज कित्येक घरात बंड चालू असेल याचा हिशोब मांडता येणार नाही. यातून कोणीच वाचणार नाही. स्त्रीला सन्मान तर द्यावाच लागेल पण तिला बरोबरीचा दर्जा पण द्यावा लागेल. बाकी सिनेमा पहा आणि तुमचं निरीक्षण नोंदवा.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत