मातृभाषेत व्यावसायिक शिक्षण घ्यायची सोय नसल्याने आजवर कित्येक हुशार विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कोर्सेसला पाठ दाखवली. उशिरा का होईना हा निर्णय आला या बद्दल स्वागत ! भारतात इंग्रजी माध्यमांमुळे मराठी मुलांवर अन्याय होत आला आहे. AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एडुकेशन) संस्थेने या निर्णयाची घोषणा केली आहे. (Engineering in marathi from this year)
मराठीसह पाच भाषांमध्ये इंजिनीरिंगचा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरु होणार आहे. सुरवातीला देशातील १४ महाविद्यालयात स्थानिक भाषांमध्ये अभ्यासक्रम चालू होणार आहे. टप्या टप्याने इतरही स्थानिक भाषांमध्ये इंजिनीरिंगचा अभ्यासक्रम येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
२९ जुलै २०२० रोजी नवीन शैक्षणिकधोरणानुसार प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये आणण्याचं शासनाने ठरवलं होतं. याशिवाय सर्व उच्च माध्यमिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे सुद्धा मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिकण्याची सोय असावी याबद्दल हे धोरण आग्रही होते. यासाठी शैक्षणिक मंत्रालय अंतर्गत समिती देखील गठीत केली होती. त्यानुसार अखिल भारतीय तांत्रिक परिषद (AICTE) यावर काम करत होती. त्यामुळे इंजिनीरिंग अभ्यासक्रम मराठीत कसा करता येईल यासाठी एक समिती कार्यन्वित केली होती. सर्व शक्यता तपासून AICTE ने हा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला.
मराठीत अभ्यासक्रम कसा शिकवला जाईल?
अभ्यासक्रम मराठीत आला म्हणजे विद्यार्थाना सगळं काही मराठीतच समजून घ्यावं लागेल असं नाही. ज्या काही वैज्ञानिक संज्ञा ह्या इंग्रजीत असतील त्या तशाच वापरल्या जातील. उदा. सॉफ्टवेअर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द न वापरता तो आहे तसाच शब्द वापरला जाईल. अनेक वैज्ञानिक संज्ञा मराठीत आणल्या तर अभ्यासक्रम अधिक अवघड वाटेल. अभ्यासक्रम मराठीत कारण्यापाठीमागचा महत्वाचा उद्देश आकलन लवकर व्हावे हा आहे. विद्यार्थ्यांना मराठीत समजून घ्यायला अधिक सोपे जावे या उद्देशाने मराठीत अधिकाधिक स्पष्टीकरण दिलं जाईल.
या निर्णयाचं स्वागत केलंच पाहिजे. शहरी भागात इंग्रजीच प्रमाण जास्त असतं याचा फायदा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना या विद्यार्थाना जास्त झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी भाषेच्या न्यूनगंडाखाली व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश टाळतात. तरीही काहीजण प्रवेश घेतात. पण भाषेच्या अडचणीमुळे ते इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी आत्मविश्वासाने अभ्यासक्रम पूर्ण करतात. अमुक भाषा येत नसेल तर ज्ञानाची दारे बंद करणे अन्यायकारक होते. उशिरा का होईना शासनाने यावर विचार केला याबद्दल कौतुकच !
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !