MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

राजकीय पक्ष आणि घराणेशाही समीकरण कधी थांबणार?

काँग्रेस पक्ष म्हटलं कि नेहरू, गांधी आणि होणारा घराणेशाहीचा आरोप. काँग्रेस वरील भ्रष्टाचाराचे आरोप मागे पडले मात्र घराणेशाही, सरंजामशाही हि दूषणे पिच्छा सोडण्यास तयार नाहीत.

घराणेशाहीचा मुद्दा अजून पुन्हा चर्चेत येण्याचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष सोडून जाणारे मात्तबर आणि ‘घरंदाज’ नेते. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पासून ते कालपर्यंत जितीन प्रसाद या माजी केंद्रीय मंत्री असलेल्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद हे काँग्रेस मधील वरिष्ठ नेते होते. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांचा विरोध होता आणि त्यांनी सोनिया यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना इथे हार मानवी लागली होती.

राहुल गांधींचा अर्धा यंग ब्रिगेड भाजपमध्ये.

यंग राहुल ब्रिगेडचा भाग असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, मिलिंद देवरा आणि जितेंद्र सिंग यांचा UPA -२ मधील मंत्रिमंडळात समावेश होता. यापैकी दोघे आज भारतीय जनता पक्षात आहेत. मिलिंद देवरा आणि सचिन पायलट कधीही प्रवेश करू शकतील अशी परिस्थिती ! नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत हेमंत बिस्वा सरमा यांनी बीजेपीला पुन्हा सत्तेत आणले. सरमा ही एकेकाळचे काँग्रेसी होते ज्यांनी तरुण गोगई यांचे पुत्र गौरव गोगई हे पक्षाची जबाबदारी स्वीकारणार समजल्यानंतर भाजपात प्रवेश केला.

अशी अनेक उदाहरणे आहेत कि ज्यामुळे घराणेशाहीचा फटका काँग्रेसला बसला आहे. तरुणांना संधी देण्याच्या नावाखाली घराणेशाही पोसली जाते. काँग्रेस सत्तेत असताना हा प्रश्न मागे पडत होता. मात्र आज उतरतीच्या काळात काँग्रेसला याचे उत्तर शोधणे भाग आहे.

सगळे पक्ष एकाच माळेचे मणी

आता येऊ दुसऱ्या बाजूला म्हणजे भाजप पक्षाकडे. तिथेही जास्त हिरवळ नाहीच. अनुराग ठाकूर, पियुष गोयल, प्रवेश वर्मा, वरून गांधी, धर्मेंद्र प्रधान, अशी अख्खी फळीच भारतीय जनता पक्षात आहे. आणि भरात भर म्हणजे जेव्हा काँग्रेस मधील वंशवादाचे प्रतीके भाजपात आल्यानंतर राष्ट्रवादी बनतात. इंडिया स्पेंड या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार १९९९ पासून काँग्रेस मध्ये ३६ तर बीजेपी मध्ये ३१ खासदार घराणेतून आले आहेत. जर काँग्रेस मधून असेच प्रवेश चालू राहिल्यास बीजेपी काँग्रेसला मागे टाकेल यात शंका नाही.

घराणेशाहीच्या राजकारणाची कारणे पाहता सर्वप्रथम डोळ्यासमोर येते घराणेशाहीचा जातीच्या राजकारणाशी असणारा घनिष्ट संबंध. जेव्हा नेता एखाद्या जातीचे नेतृत्व करतो असे मानले जाते तेव्हा तो समाज अत्यंत निष्टेने मागे उभा राहतो. हीच निष्ठा नेत्याचा मुलगा राजकारणात येतो तेव्हा त्यालाही अर्पण केली जाते.

राजकारणात पैशाचा वाढलेला वापर हाही घराणेशाही टिकून राहण्याच्या मागील एक महत्वाचे कारण म्हणता येईल. कोणताही नेता जेव्हा राजकारणात येतो तेव्हा तो अफाट माया जमा करतो. शिक्षण संस्था, सहकारी दूधसंघ ते बँका यांचा तो अनभिज्ञ सम्राट बनतो. मग या सम्राट अमरेंद्र बाहुबलीचा राजपुत्र महेंद्र बाहुबलीला गादी मिळवणे काय अवघड काम नसते.

पक्ष विचारधारेवर कमी घराण्याच्या नावावर जास्त चालतात.

महाराष्ट्राचा विचार करता राजकारण करायचे असल्यास घराणेशाही हा एकमेव निकष राजकारण करण्यासाठी लागतो का, हा प्रश्न पडतो. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी, पाटील, देशमुखांची काँग्रेस अशीच सर्व पक्षांची ओळख झाली आहे. भाजप इथे अपवाद नाही हिना गावित, सुजय विखे, प्रीतम मुंडे, हे गावाच्या सरपंच पदापासून संसदेत पोहचले असे म्हणायचे काही कारण नाही.

आम आदमी पक्षाने एकाच घरातील व्यक्तींना एकाच मतदार संघातून लढण्यास बंदी घातली आहे. मात्र बाकी पक्ष असे करतीलच असे नाही. परत एखाद्या गोष्टीवर बंदी घालणे हे लोकशाहीला धरून नाही, घराणे मोठे आहे यात आमची काय चुकी? आम्ही आज स्वकर्तुत्वाने इथे पोहचलो आहोत, असे समजणाऱ्या ‘राजपुत्रांवर’ अन्याय होईल. जर बदल घडवायचा असेल तर पक्षांतर्गत लोकशाही, मिळणाऱ्या देणग्या अशा गोष्टींमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. एक मतदार म्हणून लोकशाही आणायची कि लोकशाहीतून सरंजामशाही हे आपण ठरवायचे आहे. राहिला प्रश्न घराणेशाहीला घर घर लागण्याचा तर ते मतदार आणि संस्थात्मक बदल यावर अवलंबून आहे. नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर स्वकल्याणासाठी लोककल्याणाचे कारण देऊन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या चालूच राहणार.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.