शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या १०० व्या वर्षी आज पुण्यात निधन झालं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते भरती होते. रुग्णालयामध्येच बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्य, नाटक आणि इतिहास इत्यादी विषयात बाबासाहेब पुरंदरे यांचं योगदान मोठे आहे.
कोण होते बाबासाहेब पुरंदरे ?
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव “बळवंत मनोहर पुरंदरे” हे होत, सुरुवातीला हेच नाव त्यांच्या पुस्तकांवर पण असायचे. नंतरच्या काळात ‘बळवंत’ चे ‘बाळासाहेब’ झाले आणि शेवटपर्यंत “बाळासाहेब पुरंदरे” याच नावाने लोक त्यांना ओळखायचे. वयाच्या १४ व्या वर्षांपासून पुण्याच्या इतिहास मंडळातून बाबासाहेब पुरंदरे यांचा प्रवास सुरु झाला होता ते आज ९९ व्या वर्षी त्यांच्या निधनाने हा प्रवास थांबला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी आयुष्य व्यतीत केलं. शिव साहित्याचा अभ्यास लोकांना समजेल अश्या पद्धतीने समोर आणण्याचा काम केलं. राजा शिवछत्रपती मधून त्याची झलक मिळते. छत्रपतींच्या चरित्राची मांडणी बाबासाहेब पुरंदरे केली आहे परंतु त्यांच्या मांडणीला वेगवेगळ्या साहित्यिकांनी वेळोवेळी विरोध देखील केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रात प्रेमासोबतच विरोधही सहन करावा लागला आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांचं साहित्य.
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर १२ हजार व्याखाने दिली आहेत. पुरंदरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर प्रसिद्ध पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत, त्यात पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती हे पुरंदरे यांचं पुस्तक विक्रमी प्रसिद्ध झालं. राजा शिवछत्रपतीच्या आत्ता पर्यंत १४ आवृत्या निघाल्या आहेत. आजही लोक राजा शिव छत्रपतीला पुस्तकाला प्रचंड प्रेम देत आहेत.
इतिहासकारांचे का आहेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या साहित्यावर आक्षेप ?
कोणत्याही साहित्याचे समीक्षण होणे हे खूप साहजिक आहे परंतु बाबासाहेब पुरंदरे यांच्या साहित्यावर इतर साहित्यिकांनी आक्षेप घेतला आहे. त्यात इतिहासकार श्रीमंत कोकाटे, ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे इत्यादी आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नव्हते किंवा त्यांचा तसा दावा देखील नव्हता परंतु त्यांचे वाचक मात्र त्यांना इतिहास कार समजायचे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या साहित्यामध्ये त्यांनी इतिहाची तोड फोड केल्याचा दावा बाकी इतिहास कार आणि त्यांचे टीकाकार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख पुरंदरे यांनी “गो ब्राह्मण प्रतिपालक” असा केला आहे. पुरंदरे यांचा हा “ब्राहमण प्रतिपालक “असल्याचा दावा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी खोडून काढला आहे. गोविंद पानसरे शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांच्या “शिवाजी कोण होता मध्ये “बहुजन प्रतिपालक “असा करतात.
बाबासाहेब पुरंदरे यांचे पुरस्कार.
बाबासाहेब पुरंदरे हे शाहीर नव्हते. त्यांनी बाकी शाहिरांसारखे छत्रपती आणि इतरांवर पोवाडे लिहले नाहीत परंतु त्यांचे साहित्य शाहिराच्या पोवाड्या सारखं सुंदर आणि प्रभावी असल्या कारणाने लोकांनी बाबासाहेब पुरंदरे याना “शिवशाहीर “हा मान दिला. लोकांनी दिलेला “शिवशाहीर “हाच त्यांचा खरा पुरस्कार होता. बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि इतर संघटना आणि संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच महाराष्ट्र भूषण हा पुस्कार देऊन २०१५ साली गौरव केला तर २०१९ साली भारत सरकारने पुरंदरे यांना पद्मविभूषण देऊन गौरवित केलं आहे.
शिवचरित्र आणि शिव विश्वात रमणारा हा अवलिया आता आपल्यात नाही. परंतु त्यांचा वारसा साहित्याच्या माध्यमांतून आपल्यासाठी ठेऊन गेले आहेत. मराठी मिरर परिवारा तर्फे या महाराष्ट्राच्या रत्नास भावपूर्ण श्रद्धांजली.
-विष्णू बदाले
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !