आयपीएस ( IPS) अधिकारी आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त ऑपरेशन (DCP) सौरभ त्रिपाठी 19 फेब्रुवारीपासून ड्यूटीवर आलेले नाहीत. अचानक गायब झालेले सौरभ त्रिपाठी कुठे आहेत, याची महाराष्ट्र सरकारलाही माहिती नाही.
मुंबई क्राइम ब्रांचने उपायुक्त सौरभ त्रिपाठींवर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकतेय. अटकेपासून संरक्षणासाठी त्यांनी मुंबई सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केलीये. त्यांच्या याचिकेवर 24 मार्चला सुनावणी होणार आहे. खंडणीचा आरोप असलेल्या सौरभ त्रिपाठींना निलंबित करण्याची शिफारस मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे केलीये. राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण, पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी अचानक गायब झालेत.
सौरभ त्रिपाठी कोण आहेत ?
सौरभ त्रिपाठी 2010 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत. त्रिपाठी मुंबईत पोलीस उपायुक्त ऑपरेशन म्हणून काम करत होते. मुंबईच्या नायर रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण केल्यानंतर सौरभ त्रिपाठी IPS बनले. अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मुंबईत पोलीस उपायुक्त, राज्यपालांचे ADC, मुंबईत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीनंतर सौरभ त्रिपाठी चर्चेत आले होते. कोपर्डी प्रकरणाचा तपास करून त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.
सौरभ त्रिपाठी वर आरोप काय आहेत ?
पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीं विरोधात मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. सौरभ त्रिपाठींवर मुंबईतील अंगडीयांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप आहे. अंगडीयांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यासाठी 10 लाख रूपये मागितल्याचा आरोप केलाय.
अंगडियांकडून खंडणीचं हे प्रकरणं काय आहे ?
मुंबईतील अंगडीयांकडून जबरदस्तीने खंडणी उकळण्याचं हे प्रकरण सर्वांत पहिले उघडकीस आलं डिसेंबर महिन्यात. अंगडीयांच्या संघटनेने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार केली होती. पोलीस अधिकारी बॅगमधून पैसे घेऊन जाणाऱ्या अंगडीयांना पोलीस चौकीत बोलावून पैसे उकळत असल्याची तक्रार अंगडीयांनी केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीत पोलीस अधिकाऱ्यांनी अंगडीयांना आयकर विभागाचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचं स्पष्ट झालं. पोलीस अधिकाऱ्यांविरोधात चौकशीत पुरावे आढळून आले. त्यानंतर 19 फेब्रुवारीला मुंबईच्या एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण यात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं नाव नव्हतं. 5 लाखांची रोकड नेण्यासाठी 50 हजार रूपये आणि 10 लाखांची रोकड नेण्यासाठी 1 ते 2 लाख रूपये मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. अंगडीया कॅरिअरचं काम करतात. प्रामुख्याने रोकड, सोनं-चांदी आणि हिरे अंगडीया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. तपास यंत्रणांच्या रडारवर न येता ते कॅरिअरचं काम करतात.
सौरभ त्रिपाठी केव्हापासून गायब आहेत ?
एल. टी. मार्ग पोलीस स्टेशन मुंबईच्या झोन-2 मध्ये येतं. DCP सौरभ त्रिपाठी झोन-2 चे पोलीस उपायुक्त होते. अंगडीया खंडणी प्रकरणी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सौरभ त्रिपाठी यांची तात्काळ बदली करण्यात आली. त्यांची पोस्टिंग ऑपरेशन शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली. बदली झालेल्या दिवसापासूनच ते अचानक गायब झालेत. ड्युटीवर आलेले नाहीत. एवढंच नाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे सर्व व्हॉट्सअप ग्रुपही त्यांनी सोडून दिलेत.19 फेब्रुवारीला अचानक गायब झालेले सौरभ त्रिपाठी कुठे आहेत याची मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला काहीच माहिती नाहीये.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !