भिमा कोरेगाव आरोपांची दंतकथा रचून कार्यकर्त्यांचा जीव घेणारी व्यवस्था
प्रत्येक समाज हा त्यांच्या “राजकीय चेतनांच्या” मदतीने प्रगती करतो ह्याला इतिहासाने अगदीच मान्यता दिली आहे. पाश्चिमात्य देश त्यांनी साधलेली प्रगती आणि सोबतीला आपण भारतीय उप खंडातील देश आजही स्वातंत्र्यानंतर हवी तशी लय प्राप्त करू शकलो नाहीत. आपण नेहमी ऐकतो भारतीय समाज राजकीय प्रग्लभ आहे, पण हे पूर्ण खरे नाही. आपण फक्त राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्याकडे कुतूहलाने बघत असतो, त्यातून आंनंद घेत असतो आणि त्यालाच राजकारण समजून बसतो. “राज्य हाकणे असा राजकारणाचा साधा अर्थ आपण लावू शकतो”. राजकारण वेळेनुसार वळण घेत असते, कधी काळी राजकारण हे राजे, रजवाडे ह्यांचे होते पण आज हे आपल्या नशिबाने, आपल्या पूर्वजांच्या कष्टाने राजकारण सर्वसामान्य लोकांच्या हातात आले आहे. हजारो वर्षांच्या मेहनतीने आपल्या हातात आलेल्या राजकारणाला भारतीय माणूस समजून घेण्यात गफलत करून बसलाय. नाहीतर फादर स्टॅन स्वामी सारख्या कार्यकर्त्याचा जेलमध्ये मुत्यू होतो, ते ही वयाच्या ८३ वर्षी आणि आपल्याला यांच काहीही वाटतं नाही. आपल्या देखत सरकार हवं तेव्हा कोणालाही जेलबंद करतं आणि आपल्या प्रतिक्रिया शून्य असतात. हे सर्व चिंताजनक आणि धोकादायक आहे !
भिमा-कोरेगावचं ऐतिहासिक महत्व काय आहे ?
१८१८ मध्ये मराठा शासक पेशवे आणि इंग्रज यांच्यात भिमा नदीवर वसलेल्या पुण्याच्या बाजुच्या छोटृया भिमा कोरेगाव या गावात युद्व झाल होतं. या युद्धात महार हा समुदाय पण लढला होता. युद्धात ते विजयी झाले होते. पुढच्या काळात युद्धात महार समुदायाने केलेल्या शौर्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेण्यासाठी प्रसारित केलं, जेणेकरूण समाज स्वाभिमानाचा मार्ग पत्करेल. इथून पुढे भिमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा व्हायला लागला.
एल्गार परिषद वादाच्या भोवऱ्यात का सापडली ?
भिमा कोरेगाव शौर्य दिनाला २०१८ ला दोनशे वर्ष पुर्ण होत होते. तेंव्हा काही आंबेडकरी संघटनांकडून एल्गार परिषद पुण्याच्या शनिवार वाड्यावर आयोजित केली होती. त्यात भारतभरातून व्याख्याते बोलावले होते. पण या सगळ्याला गालबोट लागलं. भिमा-कोरेगाव आणि पुण्याच्या काही परिसरात दंगली पेटल्या. उजव्या संघटनांकडून ही दंगल घडवली असा आरोप झाला होता. काही लोकांवर पोलीस केस झाल्या होत्या, त्यात भिडे गुरूजी आणि काही उजवे लोक होते. पण अनपेक्षितपणे या सगळ्या घटनाक्रमाने वेगळ वळण घेतलं आणि या प्रकरणात वेगवेगळ्या लोकांना अटक करण्यात आली. झारखंड आणि छत्तीसगडमध्ये अदिवासी लोकांसाठी काम करणाऱ्या सुधा भारद्वाज, फादर स्टॅन स्वामी, लेखक गौतम नवलखा, तेलगू कवी वरेराव व इतर १२ जण अश्या भारतभरातून अटका झाल्या. या सर्वांवर युपा (UAPA – unlowful activities and prevention act ) लावला. यांच्यावर आरोप ठेवण्यात आला कि हे लोक पंतप्रधान मोदींना मारण्याची तयारी करत होते.
अटक करून प्रकरण थांबलं नाही.
भिमा कोरेगावच्या दंगलीच्या आरोपाखाली अटक केलेल्या या सर्व डाव्या व आंबेडकरवादी लोकांना नंतर ‘युपा’ (UAPA ) लावून ती केस एनआयए कडे (NIA- National investigation Agency ) देण्यात आली. हि संस्था देशविरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्ती वा संघटनांकडे लक्ष ठेवण्यासाठी आहे. युपा (UAPA) मध्ये अटक केल्यावर संविधानिक प्रावधानानुसार आरोपीला जमीन मिळत नाही. साहजिकच मग या सर्वांना जामीन नाकारण्यात आला. वय आणि आरोग्य खालावल्यामुळे फक्त जेष्ठ तेलगू कवी वरेराव यांना जमीन मिळाला. पण फादर स्टॅन् स्वामी यांना मिळाला नाही. दुर्दैवाने त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं. या प्रकरणात पुढे काहीही झालं नाही, यात कसल्याही प्रकारची चौकशी पुढे सरकली नाही. हि सगळी परिस्थिती बघता सरकारला चौकशी करायचीच नाही असं धोरण दिसतंय. नाहीतर एवढ्या वेळेत काही तरी पुरावे समोर आले असते. यावरून हे स्पष्ट आहे, जे लोक सहकार्य करत नाहीत, सरकारवर टिका करत आहेत, त्यांना जेलमध्ये टाकायचं. बरं त्यांच्यावर आरोप पण असे लावलेत की या सर्वांच्या संगणकांमध्ये असे इमेल मिळाले आहेत की त्यामुळे सिद्ध होत आहे की हे लोक पंतप्रधानाच्या खुनाची तयारी करत होते. पण यात सत्यता अजिबात नाही कारण ज्या इमेलची माहिती एनआयए (NIA ) नी दिली आहे ती माहिती व इमेल अमेरिकेतील “अरसेलन” नावाच्या संस्थेने तपासून बघितली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व २०१६ पासुन या सर्वांच्या संगणकामध्ये पद्धतशीर पणे टाकण्यात आले आहे. हे सर्व पाहता आपल्या लक्षात येईल कि भिमा कोरेगावच्या संबधात ह्या सर्वांना अडकवून त्यांना दुसऱ्याच वेगळ्या आरोपांवरून जेलमध्ये डांबलं आहे.
फादर स्टॅन स्वामी यांचे निधन कि हत्या ?
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोप असलेले स्टॅन स्वामी मुळचे तामिळनाडूचे, आपले शिक्षण पुर्ण करून त्यांनी काही दिवस बंगलोरमध्ये नोकरी केली. नंतर ते झारखंड मध्ये आदिवासी लोकांची सेवा करायला आले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते इथेच राहिले. आदिवासी राहतात त्या जंगलांमध्ये खनिज संपत्ती अमाप आहे. त्यामुळे त्यांचे शोषण वेगवेगळ्या माध्यमातुन चालू असायचे. यात मध्ये पडून फादर स्टॅन स्वामी आदिवासींना मदत करायचे. वेळोवेळी आंदोलने, न्यायालयीन लढे देणे चालूच ठेवायचे. याच आदिवासी भागात नक्षलवादी पण कार्यरत आहेत. नक्षलवादी लोक या भोळ्या आदिवासी लोकांचा वापर करतात. त्याचबरोबर सरकारी यंत्रणा विशेष म्हणजे पोलीस निष्पाप आदिवासी लोकांना नक्षली म्हणून अटक करतात. आदिवासी निरीक्षर असल्याने त्यातुन बाहेर काढण्यासाठी न्यायालयीन लढाई त्यांना शक्य नाही. अशा वेळेस स्टॅन स्वामी या निरपराध आदिवासींना आरोपांमधून मुक्त करत. आदिवासी लोकांना वाचवणारे फादर स्टॅन स्वामी स्वतः मात्र भिमा कोरेगाव दंगलीच्या बनावट दंतकथेच्या आरोपांचे शिकार झाले आहेत. स्टॅन स्वामी कमनशिबी ठरले त्याना वाचवणारा दुसरा कोणी स्वामी धावून आला नाही. त्यांचा या वयात असा छळ होणे हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे.
-विष्णू बदाले
(लेखक सामाजिक राजकीय अभ्यासक आहेत)
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार