राजीव सातव यांच्या अचानक जाण्याने सर्वानी हळहळ व्यक्त केली. तरुण तडफदार राजीव सातव इतक्या लवकर गेल्याने सर्वाना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा अनेक माध्यमातून सर्वजण देतायेत. देशभरातून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सत्यजित तांबे यांनी २०१३ साली झालेल्या शिबिरातील आठवण समाज माध्यमांवर सांगितली आहे. काही कार्यकर्त्यांच्या शिबिरात राजीव सातव यांनी तरुण कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करताना कोल्हापूरच्या एका कार्यकर्त्यांसाठी त्यांनी एका कागदावर काही मोजक्या शब्दात मजकूर लिहिला. तौफिक मुलानी असं या कार्यकर्त्याचे नाव आहे. यांना उद्देशून राजीव सातव यांनी मजकूर लिहिला तो असा,
“प्रत्येक मनुष्यमध्ये एका शक्ती (ऊर्जा) असते. शक्तीचा/ ऊर्जेचा आपण कसा वापर करतो यावर त्या मनुष्याचे भविष्य ठरते. आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल कर फार बाप माणूस होशील.”
या शब्दात त्यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यांचे हे शब्द फक्त कार्यकर्त्यांसाठी नाही तर प्रत्येकासाठी खूप मोलाचे आहेत. त्यांनी लिहिलेली चिट्ठी जशीच्या तशी दिली आहे. नक्की वाचा.
राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द कशी होती ?
राजीव सातव यांनी पंचायत समितीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. २००२ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी २००७ मध्ये जि. प. सदस्य पदाची निवडूक लढवली आणि जिंकले. त्यावेळी ते कृषी सभापती झाले.
प्रदेशाध्यक्ष पदाची मुलाखत दिल्लीपर्यंत घेऊन गेली.
कृषी सभापती असतानाच त्यांना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. थेट राहुल गांधी यांनीच त्यांची मुलखात घेतली. त्यावेळीस ही मुलाखत खूप चर्चेचा विषय झाली होती. आवडता नेता कोण हे विचारल्यावर राजीव सातव यांनी शरद पवार यांचे नाव घेतले होते. त्यांचा हा प्रामाणिकपणा राहुल गांधींना आवडला होता. यातूनच त्यांचे वेगळेपण सिद्ध झाले आणि त्यांना युवक प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.
२००९ मध्ये विधानसभेला गवसणी
कळमनुरी या विधानसभा मतदार संघातून २००९ मध्ये मोठ्या मताधिक्याने राजीव सातव विधान सभेवर निवडून गेले. कृषी सभापती असतानाच त्यांनी आमदारकीची तयारी सुरु केली होती. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः राहुल गांधी आले होते. पदाची अपेक्षा न करता ते काम करत राहिले म्हणूच त्यांच्याकडे खूप विश्वासाने बघितले जाते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचं नाव सर्वात पुढे असूनही त्यांनी पदासाठी हट्ट धरला नाही.
२०१४ मध्ये देशभरात मोदी लाट असतानाही राजीव सातव निवडून आले. यावेळेस काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या त्यात राजीव सातव होते म्हणून त्यांचं पक्षात चांगलंच वजन वाढलं होतं.
चार वेळा संसद रत्न पुरस्कार
संसदेत ८१ टक्के उपस्थिती आणि आणि १०७५ प्रश्न विचारून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची जाणीव सगळ्यांना करून दिली होती. पाच वर्षाच्या काळात त्यांना चार वेळेस संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. राज्य सभेत देखील त्यांनी अनेक महत्वाच्या प्रश्नावर विश्लेषणात्मक भाषण दिले आहे. शेती, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचे प्रश्न पोटतिडकीने ते मांडत आले होते.
मुलींना NDA मध्ये प्रवेश द्यावा ही मागणी राजीव सातव यांनी लोकसभेत केली होती. त्यांच्या मागणीला यश सुद्धा आले.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार