MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

काँग्रेसचा २०२४ चा प्लॅन फेल झालाय, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार नाही कळतंय

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोंगाट एवढा झालाय कि मराठी माणसांना राष्ट्रीय राजकारणातल्या बातम्या मागच्या एक महिन्यात येणं जवळ जवळ बंदच झालंय. पण, आज आपल्याला राष्ट्रीय बातम्यांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तेवढी महत्वाची घडामोड राष्ट्रीय राजकारणात घडली आहे. राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस मध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवला आहे. मागच्या एका महिन्यापासून प्रशांत काँग्रेस मध्ये जाणार आहेत अश्या बातम्या येत होत्या. पण आज रणदीप सुरजेवाला यांनी प्रशांत यांच्या बाबतीत ट्विटरवरून माहिती दिली ती अशी …

तुम्ही जर बातम्या बघितल्या नसतील किंवा फारसं राजकारणावर लक्ष दिल नसेल तर म्हणाल कोण आहे हा प्रशांत किशोर. कि ज्याच्या काँग्रेस मध्ये न जाण्याने काँग्रेस हरेल ? तर चिंता नका करू सगळं समजून सांगतो. कसा काँग्रेसचा २०२४ चा प्लॅन गंडला आहे आणि का काँग्रेसला प्रशांत किशोर महत्वाचा होता. एक एक करून समजून घेऊ

कोण आहे प्रशांत किशोर ?

भारतीयांना प्रशांत किशोरची ओळख झाली ती २०१४ च्या लोकसभा निवडणुकी नंतर. २०१४ च्या निवडणुकीत प्रशांत किशोरने नरेंद्र मोदी यांच्या साठी काम केले होते. त्यांच्या प्रचारापासून तर त्यांच्या भाषणापर्यंत सर्व गोष्टी प्रशांत किशोर यांनीच केल्या आहेत. २०१४ चे निकाल काय आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तेंव्हापासून प्रशांत किशोर नेहमीच चर्चेत असतो.
मोदी यांची सोबत प्रशांत यांनी खूप लवकर साथ सोडली आणि २०१५ च्या बिहार निववडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्यासाठी काम केले. एक वर्षाच्या अंतरानेच प्रशांत किशोर यांनी जादू केली आणि भारतीय जनता पक्षाला बिहार मध्ये हरवून दाखवले. २०१५ च्या नंतर प्रशांत किशोरने आंध्रप्रदेश मध्ये जगमोहन यांचं काम केलं , दिल्लीत केजरीवाल यांचं काम केलं आणि २०१७ च्या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसच देखील काम केलं आहे. फक्त २०१७ ची उत्तरप्रदेश निवडणूक सोडली तर प्रशांत किशोर सगळी कडे यशस्वी ठरले आहेत.
पण त्यांचं सगळ्यात मोठं यश मानलं गेलं ते पश्चिम बंगालच. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम केलं आणि त्यांनी मोठ्या बहुमताने निवडून आणलं. निवडणुकीच्या आधीच सहा महिने प्रशांत यांनी भाजप तीन अंकी आकडा गाठू शकणार नाही असं ट्विट केलं होत. जर भाजपने तीन अंकी आकडा गाठला तर मी काम सोडून देईल असं चॅलेंज त्यांनी भाजपला दिल होत.

बंगालच्या निवडणुकीचे निकाल आपल्या सर्वाना माहित आहेत. भाजपने सर्व ताकद लावून देखील त्यांना १०० च्या आसपास जाता आले नाही. त्याउलट ममता बॅनर्जी यांनी २९४ पैकी २१८ जागा जिंकत त्यांची सत्ता राखली. एवढं सगळं वाचल्यावर तुम्हाला आयडिया आली असेल कि प्रशांत किशोर कोण आहे.

काँग्रेसला का गरज होती किशोरची ?

काँग्रेस त्यांच्या सर्वात वाईट काळात आहे. २०१४ पासून ते एका मागून एक निवडणूक ते हरत आहे. मार्च महिन्यात पंजाब सारख्या राज्यात त्यांनी सत्ता गमावली आहे. उत्तरप्रदेशात ४०३ जागांपैकी ३८७ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचं डिपॉजिट गमावलं आहे. सतत सतत झालेल्या पराभवांमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले आहे. सध्या काँग्रेसचे कार्यकतें खूप अस्वथ आहेत. हीच स्थिती जर आणखी काळ राहिली तर काँग्रेस संपू शकते असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्व मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच्याकडे असं नेतृत्व उरल नाही कि जो काँग्रेसला चांगले दिवस आणून देऊ शकेल. ती संधी काँग्रेस प्रशांत किशोर यांच्या बघत होती. त्यांना काँग्रेस मध्ये सहभागी करून त्याचा फायदा काँग्रेसला करून घ्यायचा त्यांचा प्लॅन होता. प्रशांत यांच्याकडे जो अनुभव आहे. तो सध्या भारतात कोणत्याही राजकीय रणनीतिकाराकडे नाही किंवा प्रशांत यांच्या एवढा कोणाचाही रेकॉर्ड क्लियर नाही. त्यामुळे काँग्रेसला प्रशांत किशोरची गरज होती.

प्रशांतने काँग्रेस जॉईन करायला का नकार दर्शवला ?

पश्चिम बंगालच्या निवडणूक झाल्यापासून प्रशांत किशोर काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यांनी स्वतः देखील मी काँग्रेस सोबत बोलणी करत असल्याचा माध्यमांना सांगितलं होत. निवडणुका जिंकायच्या असल्यास काँग्रेसने काय करायला हवे याचे सोल्युशन्स प्रशांत यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिल्याचे त्यांनी सांगितलं होत. पण सर्व अटीवर योग्य मार्ग न निघाल्यामुळे त्यांनी काँग्रेस जॉईन केली नसल्याचं प्रशांत यांनी माध्यमांना सांगितलं होत.

पाच राज्याच्या निवडणुकानंतर तर काँग्रेसची अवस्था खूपच वाईट झाली. पाचही राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे त्यांना प्रशांत किशोरची गरज वाटू लागली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यात परत बोलण्या सुरु झाल्या होत्या. मध्ये मध्ये तर अश्या बातम्या यायच्या कि प्रशांत यांनी काँग्रेस जॉईन केली आहे.
पण आज परत प्रशांत यांच्या अटी मान्य न झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस जॉईन न करण्याचा निर्णय केला आहे. प्रशांत यांना पूर्ण निर्णय स्वातंत्र्य हवं होत पण काँग्रेस ते द्यायला तयार नव्हते. म्हणूनच त्यांनी काँग्रेस जॉईन न केल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर यांनी हा निर्णय का घेतला याचं उत्तर ते स्वतःचं देऊ शकतील. पण सध्या तरी प्रशांत यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

काँग्रेस आणि किशोर यांचं पुढे काय ?

हि सर्व खटपट चालू होती काँग्रेसची स्थिती सुधरवण्यासाठी पण सर्व फेल गेलं आहे. पण आता पुढे काय हा प्रश्न उरतो ? रणदीप सुरजेवाला यांच्या ट्विट नंतर प्रशांत किशोर यांनी देखील एक ट्विट केलं आहे. प्रशांत यांचं ट्विट खूप बोलकं आहे.

प्रशांत यांनी त्यांच्या ट्विट मध्ये स्पस्ट केलं आहे कि,” काँग्रेसला माझ्या पेक्षा एक चांगल्या नेत्याची गरज आहे. जो सर्वाना सोबत घेऊन पक्षातले छोटे छोटे प्रश्न सोडवेल. किशोर यांच्या ट्विट वरून कळतं कि ते काँग्रेस मध्ये काय बदल करू पाहत होते पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी त्याचा वेगळा रास्ता निवडला आहे. काँग्रेसला देखील त्यांच्यासाठी नवा प्रशांत किशोर शोधावा लागेल त्याशिवाय त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. येत्या काळात प्रशांत किशोर आणि काँग्रेस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण देशाचं राजकारणं एका निर्णयामुळे बदलणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.