MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

एक जागा गेली म्हणून शरद पवारांना तिकीट दिलं आणि इतिहास घडला.

शरद पवार त्यांची ८१ वर्ष आज पूर्ण करत आहेत. भारताच्या राजकारणात शरद पवार आज सर्वात अनुभवी नेते आहेत. शरद पवारांबद्दल उत्सुकता नसलेला माणूस मिळणं तसं अवघडच. मागच्या ५३ वर्षांपासून शरद पवार कुठल्या न कुठल्या मार्गाने महाराष्ट्रात सत्तेत आहेत. २०१९ च्या विधानसभेनंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणण्याची जादू महाराष्ट्राने अनुभवली आहे. शरद पवार केंद्रीय आणि राज्याच्या राजकारणात सतत सक्रिय असतात. ते केंद्रीय संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री पदाचा त्यांचा काळ तर गाजलाच. शरद पवार कृषी मंत्री असतानाच देश अन्नधान्य निर्मितीत स्वयंपूर्ण झाला.
असे शरद पवारांचे अनेक पैलू सांगता येतील पण आज आज शरद पवारांची संसदीय राजकारणात एंट्री कशी झाली हा मजेदार किस्सा समजून घेऊ.

आमदार होण्याअगोदरचे शरद पवार

शरद पवार यांच्या घरचे वातावरण तसे राजकारणाला पोषकच होते. त्यांच्या आई ‘शारदाबाई पवार’ शेतकरी कामगार पक्षाकडून लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. बारामतीतले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर शरद पवार पुण्याच्या बी. एम.एम.सी.सी. महाविद्यालयात कॉमर्स शिकण्यासाठी आले आणि तिथूनच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. महाविद्यालयात शरद पवार विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत होते. त्या काळातच शरद पवार काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार काँग्रेस मध्ये काम करायला लागले. महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे काम शरद पवार बघायचे

१९६७ च्या निवडणुका

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६७ ला दुसऱ्यांदा विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुका होऊ घातल्या होत्या. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंत दादा पाटील काँग्रेसची नेते होते. निवडणुकीसाठी उमेदवार ठरवत असताना बारामती मतदार संघातून ‘शरद पवार’ यांचे नाव पुढे आले. शरद पवार नवखे होते. त्यांनी या अगोदर निवडणूक लढवली नव्हती त्यामुळे बारामतीचा उमेदवार ठरवताना काँग्रेस नेत्यांची अडचण झाली होती. सर्व मतदारसंघातील उमेदवार ठरले होते. बारामतीवर मात्र घोडे अडले होते. काँग्रेस नेते शरद पवार यांच्या नावावर एकमत होत नव्हते. शरद पवार यांच्या घरातील लोक शेतकरी कामगार पक्षाचं काम करतात. शरद पवार यांच्याकडे अनुभव नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात यावी यासाठी बारामतीतील इतर काँग्रेस नेते आग्रह करत होते. निर्णय होत नाही म्हणून काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण साहेबांकडे सल्ला घेण्यासाठी गेले. बारामती मध्ये उमेदवार पक्का होत नाही. काही लोक शरद पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत असल्याचं यशवंतराव चव्हाण साहेबांना सांगण्यात आलं.

यशवंतराव चव्हाण साहेब शरद पवारांना ओळखून होते. त्यांच्या नेतृत्वाबद्दल यशवंतराव चव्हाण यांना खात्री होती. विद्यार्थी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी केलेले काम यशवंतराव चव्हाण यांनी बघितले होते. त्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारीला यशवंतराव चव्हाण यांनी हिरवा कंदील दिला आणि सांगितले, “महाराष्ट्रात काँग्रेस २८८ जागांवर लढणार आहे. त्यापैकी आपले २०० आमदार निवडून येतील आपण महाराष्ट्रात सहज सरकार बनवू त्यामुळे शरद पवार यांना उमेदवारी द्यायला काहीच हरकत नाही. असं समजा आपल्याला एक जागा कमी मिळेल. बारामतीची जागा काँग्रेस हरेल असं गृहीत धरून शरद पवारांना उमेदवारी द्यावी असे सर्वाना आदेश दिले. यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः बारामती मधून शरद पवारांची उमेदवारी जाहीर केली.

पहिल्या निवडणुकीला उमेदवारीसाठी शरद पवारांना स्वपक्षातील लोकच विरोध करत होते. तेच शरद पवार १९६७ पासून बारामती मधून एकदाही हरले नाहीत. शरद पवार बारामतीमध्ये आजपर्यंत अपराजित आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.