राज्यात उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आल्यावर राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातवरण आहे. दर वर्षी आपल्या देशात गरजे पेक्षा कांद्याचे उत्पादन जास्त होते. तरीही केवळ साठवणुकीच्या जुनाट पद्धतीमुळे आणि निर्यातीत सातत्य नसल्यामुळे आपला कांडा वाया जातो. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना आणि शेतीमालाचा उत्पादन खर्च जवळपास दुप्पट झालेला असताना कांदा कवडीमोल का होतो आहे, कांद्याचं गणित नेमकं कुठं चुकलय, याचा आढावा घेणं बनतच.
सध्या कांद्याची स्थिती
राज्यात खरीप, रब्बी (रांगडा) आणि उन्हाळी अशा तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते. यंदा पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे तीनही हंगामांत कांदा लागवडीखालील क्षेत्रात सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी एप्रिल शेवटी सुरू होते. परंतु, यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. कांद्याच्या पाती उन्हामुळे जाळून गेल्या आहेत. कांद्याची वाढ झाली नाही. कांदा लहान राहिला. त्यात उन्हामुळे जमिनीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेपेक्षा दहा-पंधरा दिवस अगोदरच काढणी करावी लागली.
भाव का पडलेत ?
काढणी केलेल्या कांद्याला उन्हाचा फटका बसल्यामुळे तो कांदा चाळीत आणि गोदामात साठविला तरी तो सडण्याची शक्यता जास्त असल्यामुळे शेतकरी हा कांदा विक्रीची घाई करत आहेत. पण, बाजारात कांद्याला मागणी नाही, कांदा लहान आहे आणि पुन्हा तो सडण्याची भीती आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून कांदा अक्षरश: कवडीमोल झाला आहे. मागील महिन्यांत एक क्विंटलदोन हजार रुपयांच्या घरात असलेल्या कांद्याची थेट ४०० ते १३०० रुपयांमध्ये विक्री होत आहे. सरासरी दर ७००-८०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सोडाच, शेतातील कांदा काढून तो बाजारात विक्रीला घेऊन जाणेही परवडत नाहीये असं कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
देशातील स्थिती
कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असलेलं राज्य आहे. जवळ जवळ ३० % कांदा महाराष्ट्रातच पिकतो.महाराष्ट्राच्या खालोखाल कांदा उत्पादनात कर्नाटक (१७ टक्के), गुजरात (१० टक्के), बिहार व मध्य प्रदेश (७ टक्के), आंध्र प्रदेश (५ टक्के) आणि राजस्थान, हरियाणाचा प्रत्येकी ३ टक्के वाटा आहे. देशात सरासरी कांद्याचे उत्पादन २५० लाख टनांच्या आसपास होते. २०१९-२० मध्ये २६० लाख टन, २०२०-२१ मध्ये २७० लाख टन कांदा उत्पादन झाले होते. यंदा देशातील कांदा लागवडीखालील क्षेत्रात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यंदा उत्पादनात सुमारे ४० लाख टनांनी वाढ होऊन एकूण उत्पादन ३०० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या निर्यातीचा पण प्रॉब्लेम आहे
नाफेडच्या २०२०-२१च्या आकडेवारीनुसार सरासरी २५ लाख टन कांद्याची निर्यात होते. बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका, नेपाळ, इंडोनिशिया आणि कधी कधी भारतीय कांदा रशिया, जर्मनीला पण निर्यात केला जातो. कांद्याचे व्यापारी आणि शेतकरी म्हणत आहेत , देशात यंदा कांद्याचे खूप जास्त उत्पादन होणार आहे. केंद्र सरकारने निर्यातीचे नियोजन केले नाही तर कांदा मातीमोल होणार आहे. कांदा निर्यातील अनुदान गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान मिळायलाच पाहिजे. त्याशिवाय देशातील कांदा बाहेर जाणार नाही. दरवर्षी देशातून सुमारे २०-२५ लाख टन कांदा निर्यात होतो, त्यात वाढ होऊन ४० लाख टन कांदा निर्यात झाला पाहिजे. निर्यातीत सातत्य नाही. देशात कांद्याचे भाव वाढले की, आपण निर्यात बंद करतो. त्यामुळे जागतिक बाजारात बेभरवशाचा कांदा निर्यातदार देश, अशीच आपली ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी निर्यातीत सातत्य ठेवले पाहिजे. युरोपीय देशांना निर्यात कशी होईल, याचा यंत्रणेने विचार केला पाहिजे. नाही तर आपल्याला शेतकरयांचे नुकसान होणे पक्क आहे. सरकारने वाईट वेळ यायच्या आधीच पाऊले उचलले पाहिजे.
कांद्याच्या प्रक्रिया इंडस्ट्री वाढल्या नाहीत
जगात कांदा उत्पादनात चीन आघाडीवर असून, जागतिक उत्पादनात चीनचा वाटा २७ टक्के आहे. त्यानंतर भारताचा नंबर (२० टक्के) लागतो. तुर्कस्तान- २.५० टक्के, पाकिस्तान – २.२४ टक्के, ब्राझील – २.५ टक्के, रशिया – २ टक्के आणि म्यानमार – १.५० टक्के या देशांतही कांदा उत्पादन होते.“भारत जगातील एक प्रमुख उत्पादक देश आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील काही भागात कांदा उत्पादन होते. कांदा चाळ आणि गोदामात साठवणुकीची सोय असली तरी ती खूप कमी आहे. त्यामुळे शेतकरी विक्रीवर भर देतात.” जळगावमधील जैन उद्योग समूहाचा अपवाद वगळता राज्यात कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगवाढलेला नाही.वाळलेला कांदा, कांदा जाम, कांदा पावडर आदी उद्योगांचा विस्तार होण्याची गरज होती. पण दुर्दैवाने ती महाराष्ट्रात झाली नाही.
जास्त उत्पन्न झाले तर कांद्याचे काय केले जाते ?
खरीप आणि उशिराचा खरीप कांदा जास्त दिवस टिकत नाही. या कांद्यात पाण्याचे प्रमाण खूप असते. भारतात जवळ जवळ ६० ते ७० लाख टन कांदा=ठेवण्याची क्षमता आहे. कांदा चाळीमध्ये जास्त कांदा असतो. मात्र चाळींमधील कांदा उन्हामुळे, पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे, आणि थंडीमुळे खराब होतो. कांद्याला कोंब येतात, तो सडतो, त्याचे वजनी कमी होतो. परिणामी कांदा चाळीतील सरासरी ३० ते ४० टक्के कांद्याचे नुकसान होते. देशात दरवर्षी सरासरी ३० लाख टन कांद्याचे विविध कारणामुळे नुकसान होते. लोकसंख्या वाढल्यामुळे सुमारे दीडशे लाख टन कांदा खाण्यासाठी वापरला जातो. सुमारे २५ लाख टन कांद्याची निर्यात होते. गुजरातमधील भावनगर येथील प्रक्रिया केंद्रावर केंद्रावर मोठ्या प्रमाणात कांदा वापरला जातो.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !