महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले होते. वयाच्या तेराव्या वर्षांपासून ते चळवळीशी जोडले गेले होते. स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधी आणि अशा अनेक लोकांच्या प्रभावामुळे त्यांनी सुरवातीला अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी काम करायला सुरवात केली. या विषयावर काम करत असताना त्यांनी पुढे जाऊन डोंगर भागातील महिलांना एकत्र करून दारूबंदी साठी चळवळ उभी केली.
बहुगुणा यांचा जन्म उत्तराखंड मधील असल्याने हिमालयाचा त्यांचा जवळचा संबंध होता.
त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला.
त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला होता. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते हिमालयातील नैसर्गिक परिस्थिती आणि लोकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम याबद्दल त्यांना जाणीव होती. त्याबद्दल सतत बोलत होते त्याप्रश्नावर आवाज उठवत होते. म्हणूनच पुढे जाऊन पर्यावरण प्रेमी हीच ओळख त्यांना कायमची मिळाली. सुंदरलाल बहुगुणा म्हणजे भारतातील सुरवातीच्या काळातील पहिले पर्यावरण प्रेमी म्हणले तरी हरकत नाही, एवढं मोठं काम त्यांनी उभं केलं. त्यांच्या या कामाला हातभार लावण्यासाठी जगभरातून अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले.
१९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली
१९७० साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराने स्थानिक गावकऱ्यांचे डोळे उघडले. या महापुरामुळेच “जंगलतोड, भूस्खलन आणि पूर यांच्यातला संबंध स्पष्ट झाल्याचं” इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी चिपको आंदोलनाचं वर्णन करताना म्हटलं होतं. या महापुरानंतर तीन वर्षांनी बहुगुणा आणि सहकारी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारण्याचं आंदोलन सुरू केलं. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. दरम्यान निसर्ग संवर्धनासाठी अनेक तरुणांनी बोट कापून शपथा घेतल्या होत्या. लवकरच हिमालयाच्या कुशीतल्या गावांमधल्या स्त्रियांनीही या आंदोलनात उडी घेतली. त्या झाडांना मिठी मारायच्या, झाडांना राखी बांधायच्या. इतकंच नाही तर वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांची हत्यारंही पळवायच्या. १९८१ साली केलेल्या उपोषणानंतर सरकारने उत्तराखंडमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली. यामुळे व्यावसायिक वापरासाठी झाडांची कत्तल करण्यावर १५ वर्षांसाठी बंदी झाली.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बहुगुणा यांच्या आंदोलनाविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या,
“खरं सांगायचं तर मला त्यांच्या आंदोलनामागचा नेमका उद्देश काय आहे, ते माहिती नाही. पण, त्यांना जर खरंच वृक्षतोड थांबवायची असेल तर मी त्यांच्यासोबत आहे.”
१९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले
टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.
भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम शेवटपर्यँत चालू होते. ८ मे रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते दवाखान्यात भरती झाले होते. दुर्दैवाने या लढाईत ते हरले. २१ मे २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्करानी सन्मानित करण्यात आले आहे. पदमश्री, पद्म विभूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले होते. शिवाय IIT रुरकी या संस्थेने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देखील दिली होती.
सुंदरलाल बहुगुणा यांच्या कार्यास सलाम !
हे खास आपल्यासाठी
समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा संबंध नाही नेमका विषय समजून घ्या
नागराज मंजुळेने समाजाचं जे वास्तव दाखवलं ते बाकीच्यांना का जमलं नाही
कोरोना आला कि राजेश टोपे, वडेट्टीवार जागे होतात, भीती पसरवतात.