१०-१२ वर्षाची मुलगी रस्त्याच्या मधोमध तरफडते आहे. तोंडाला फेस आलाय, हात पाय डांबरी रस्त्यावर आपटतीये. तरफडणाऱ्या हाता-पायांपासून गाड्या ये जा करतायेत. कॅमेरा वर जाईल तसा आसपास धावणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढतीये. शेवटी एक गाडी त्या मुलींच्या अंगावरून जाते. तरफडणारं शरीर थांबतं पण गाडी थांबत नाही. चित्रपटाच्या सुरवातीला हा निराश करणारा प्रसंग आहे. पण या निराशेला लेखकाने बलिदानाची झालर लावली आहे. म्हणून इथून पुढे सिनेमात त्या मुलीच्या चेहऱ्या ऐवजी देवीचा चेहरा पहायला मिळतो. हा चेहरा आशा निर्माण करतोय. थोडा समजायला कठीण वाटेल कदाचित पण याप्रसंगातून काय अर्थ निघतो हे समजून घेण्यासाठी गावातल्या लोकांच्या जगण्याच्या कल्पना, त्यांचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागेल. इथे मुख्य मुद्दा लक्षात घ्या मानवी आयुष्याच्या ज्या कल्पना, रूढी परंपरा ठराविक वर्गाने मान्य केल्या आहेत, त्याच कल्पना या लोकांच्या नाहीत म्हणून यांना माणूस म्हणून जगायची सोय नाही.
चित्रपटाची कथा अशी आहे.
चित्रपटाची कथा सरळ आणि सोपी आहे. कर्णनच्या गावाला बस थांबत नाही. त्यासाठी गावातली लोक अर्ज विनंत्या करत आहेत पण काहीच फरक पडत नाही. एक बस न थांबणे आजच्या काळात आपल्याला महत्वाचं वाटणार नाही कदाचित. एखादी सेवा नाकारणे म्हणजे व्यवस्थेचं तुमच्याकडे दुर्लक्ष आहे असं नाही तर व्यवस्था तुमच्या अस्तित्वालाच मानत नाही, असा आहे. अश्या परिस्थितीत अन्याय होतोय आणि त्याचा प्रतिकार करायला कोणीतरी जन्म घेतंय हे एवढं सोपं बोलून या चित्रपटाचं विश्लेषण करणे म्हणजे मानवी जीवनाच्या पैलूंबद्दल विशेषतः विषमतेबद्दल अनभिज्ञ राहण्यासारखं आहे.
निसर्गाच्या माध्यमातून विषमता मांडणारा चित्रपट
हा सिनेमा फक्त संवादातून व्यक्त होणारा नाही. मारी सेल्वराज या दिग्दर्शकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याने आधीच्या पण त्याच्या परियेरुम पेरुमल सिनेमातून निसर्गातील प्रतीकांचा पुरेपूर उपयोग करून वंचित वर्गाच्या परिस्थितीला समोर आणलं आहे. गरुडाला भीक मागून तो कोंबडीचे पिल्लं उचलायचा थांबणार नाही असं कर्णन सुरवातीलच बोलतो. गाढवाचे पुढचे पाय बांधले आहेत. घोडा मोकळा आहे पण तो कधीच मुक्तपणे उधळत नाही. मालकाने पाय सोडल्याशिवाय गाढव स्वतंत्र होणार नाही. पण घोडा हा तर स्वतंत्र दिसत असला तरी धावण्यासाठी जी हिम्मत लागते ती त्यात नाही. एका अर्थाने दोघांनाही स्वतंत्र अस्तित्व नाही. अशा वेळेस कर्णन म्हणजे बंडखोर प्रवृत्ती निर्माण व्हावीच लागते. जुन्या पिढीने परिस्थितीशी जुळवून घेऊन निभावलं पण नवीन पिढी बंडखोर आहे. ती अन्यायाविरोधात बोलणारी आहे. कर्णन या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय. ते बंड यशस्वी होतंय का यासाठी हा चित्रपट बघा.
तलवार जिंकून आलेल्या कर्णनच्या (कर्ण) प्रेमात द्रौपदी पडते
नमुनेदार हिरो व्हिलन या पठडीतला हा सिनेमा दिसतो पण तेवढ्यासाठी बघायचा असेल तर सिनेमाचा मुख्य हेतू समजलाच नाही असं म्हणावं लागेल. इथे लोक डोके नसलेल्या देवाला पूजतात. मुर्त्या तोडल्या गेल्या म्हणून ते असं करत नाही तर समाजात त्यांना ओळख नसल्याचं हे प्रतीक आहे. महाभारतातील द्रौपदी आता जात बघून अर्जुनाची निवड करणार नाही. म्हणून तर तलवार जिंकून आलेल्या कर्णनच्या (कर्ण) प्रेमात द्रौपदी पडते. गावातील प्रमुख माणसाचं नाव दुर्योधन आहे. पुराणांनी चांगलं वाईट आधीच ठरवून टाकलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला हे नाव ऐकल्यावर राग येतो. म्हणजे दुर्योधन हा कौरवांचा प्रतिनिधी तो वाईटच असणार, हे आपण आधीच ठरवून टाकलं आहे. या सगळ्या कल्पनांना छेद देण्यासाठी हा सिनेमा धरपडतोय. दिग्दर्शक या सिनेमाला मसाला चित्रपटासारखं मांडू शकला असता पण त्याने ही बाब टाळून लोकांच्या समस्येवर जास्त भाष्य केलं आहे.
संवाद केलाच नाही तर यांचे प्रश्न कसे कळणार?
पोलिस स्टेशन सारख्या सार्वजानिक मालमत्तेवर हल्ला झाला तर हिंसा दिसते पण या व्यवस्था जेव्हा दडपशाहीचे केंद्र बनतात तेव्हा त्याच काय केलं पाहिजे, हे ठरवावं लागेल. पोलिसांच्या त्रासाला कंटाळलेले लोक जेव्हा एकट्यात ज़िल्हा अधिकारीला भेटायला बोलावतात. तेव्हा या लोकांचं म्हणणं ऐकायचं सोडून ज़िल्हा अधिकारी निघून जातो. तो अधिकारी कदाचित चांगला असेल पण त्याने संवाद केलाच नाही तर यांचे प्रश्न कसे कळणार? आजवर शासकीय व्यवस्था हेच करत आली आहे. कर्णन चित्रपट हीच बाजू सांगायचं प्रयत्न करतोय. गावातील लोकांना ही व्यवस्थाच मान्य नाही असं अजिबात नाही. त्यांनाही त्यांच्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं असं वाटतंय. शासकीय यंत्रणांना त्यांचा विरोध नाही. चित्रपटाची मूलभूत मांडणी ही सरसकट व्यवस्थेला विरोध करणारी नाही. पण न्यायाच्या प्रतीक्षेत मात्र आहे.
मराठी सिनेमा सैराट नंतर थांबतो. बॉलीवूड अजूनही सलमानच्या राधे मधेच रमतो.
चित्रपट श्रुष्टीला विषयाचं ग्रहण लागलं असं वाटत असताना तामिळ सिनेमा मात्र या सगळ्यांना पुरून उरतो. दिग्दर्शक मारी सेल्वराज त्याच्या सिनेमातून मसाला चित्रपट आणि संवेदनशील चित्रपट याच्या खूप पुढे जाऊन सिनेमा कसा बनवला पाहिजे याच मूर्तिमंत उदाहरण कर्णन सिनेमातून दाखवतो.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत