राज ठाकरेंच्या सभेतून सुरु झालेला हनुमान चालीसाचा विषय उद्धव ठाकरेंच्या घरापर्यंत पोहचला. राणा दाम्पत्य यात आघाडीवर होते. राज ठाकरेंपेक्षा राणा दाम्पत्य यांनी हा विषय जास्त महत्वाचा मानला. म्हणून तर हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर म्हणावी लागेल असा त्यांनी आग्रह धरला. हनुमान चालीसा कुठे म्हणायची हे ज्याने त्याने ठरवावं आजचा आपला विषय तो नाही. पण इकडं आपण हनुमान चालीसा कुठं म्हणायची हा वाद सुरु होण्याआधी आंध्रप्रदेश आणि कर्नाटक दोन राज्ये भांडण करतायेत कि हनुमानाचा जन्म नेमका कुठं झाला म्हणून?
राम जन्माचा मुद्दा २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सोडवला आणि लगेचच हनुमान जन्मभूमीचा वाद उफाळून आलाय. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश दोन्ही राज्यांनी हनुमान जन्मभूमी त्यांच्या राज्यात असल्याचा दावा केला आहे. आंध्रमधील तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या दाव्यानुसार बजरंग बलीचा जन्म तिरुमला येथील अंजनचलम टेकड्यांमध्ये झाला होता, तर कर्नाटकच्या श्री हनुमद जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा दावा आहे की हनुमान जन्म हम्पीजवळील अनेगुंडी येथे झाला होता.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) आणि कर्नाटकातील श्री हनुमद जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने त्यांच्या राज्यात हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केल्यानंतर हा मुद्दा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उफाळून आला होता. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) आंध्रप्रदेशने म्हटले आहे की पुराण आणि ताम्रपटातील शिलालेख यांसारखे प्राचीन शास्त्र स्पष्टपणे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अंजनाद्री ज्याला आता तिरुमाला म्हणतात इथे स्पष्टपणे उल्लेख आढळतो. हनुमान जन्मस्थळ संशोधन करण्यासाठी टीटीडीने याआधी प्रख्यात विद्वान आणि शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने पुराण, पुरातत्व विभाग आणि इतर पुराव्याच्या स्त्रोतांवर संशोधन केले आणि तिरुमला अंजनाद्री इथेच हनुमानाचा जन्म झाल्याची पुष्टी केली होती. समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की “जगातील इतर कोणत्याही भागात हनुमान जन्मस्थळ असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही सबळ पुरावा सापडला नाही.”
दरम्यान कर्नाटक तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हंपी हे जागतिक वारसा स्थळ हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्यासाठी एक समिती स्थापन केली. कर्नाटक तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पॅनेलमध्ये वैदिक विद्वान, इतिहासकार आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वैज्ञानिक मिळून आठ सदस्यांचा समावेश केला. यावर कर्नाटक तीर्थ क्षेत्र समितीने असा अहवाल दिला कि, “आमचे पुरावे काही पौराणिक आवृत्त्यांवर आधारित नाहीत,” पॅनल सदस्य आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू व्ही मुरलीधर शर्मा यांनी सांगितले कि, “आम्ही धार्मिक साहित्य आणि शिलालेखांमध्ये उपलब्ध पुराव्यासह लोकप्रिय विश्वासाला समर्थन देण्यासाठी अहोरात्र काम केले आहे.”
पॅनेलनुसार हनुमानाचा जन्म त्रेतायुगात अंजना देवीच्या पोटी झाला होता. तिला पुत्रप्राप्तीसाठी वेंकटचलम टेकडीवर तपश्चर्या करण्यास सांगितले होते. हनुमानाच्या जन्मानंतर व्यंकटचलम हे अंजनाद्री म्हणून ओळखले जाऊ लागले. स्कंद पुराण, वराह पुराण आणि ब्रह्मांड पुराण यांसारख्या ग्रंथांकडे लक्ष वेधून शर्मा म्हणाले की, बाळ हनुमानाला आकाशात झेप घेतल्याबद्दल आणि सूर्य खाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देवांनी शिक्षा दिल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने त्या प्रदेशाचे नाव अंजनाद्री ठेऊन दुःखी मातेचे सांत्वन केले होते.
कर्नाटक श्री हनुमद जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त गोविंदानंद सरस्वती यांनी टीटीडी पॅनेलच्या दाव्याला कडाडून विरोध केला आणि घोषणा केली की ते हंपी येथे २१५ फूट हनुमानाची मूर्ती स्थापित करणार आहेत. तर टीटीडीने तिरुपती मध्ये भूमिपूजन केले आहे आणि भव्य हनुमान मूर्ती स्थापना करून अनेक विकासकामे केली जातील असं सांगितलं आहे. दोन्ही संस्थांनी एकमेकांचे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत असा अर्थ यावरून निघतो.
शर्यतीत तिसरा स्पर्धक
टीटीडी आणि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट दावा करत असताना या भांडणात तिसरा स्पर्धक तिसरा स्पर्धक देखील आला आहे. कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख राघवेश्वर भारती यांनी दावा केला आहे की खरे ठिकाण कर्नाटकच्या गोकर्णाच्या किनारपट्टीतील कुडले बीच येथे आहे. राघवेश्वर भारती म्हणाले की वाल्मिकी रामायणात हनुमान स्वतः सीतेला सांगतात की त्यांचा जन्म गोकर्णात झाला होता. रामायणावर आधारित आपण असे म्हणू शकतो की गोकर्ण ही हनुमानाची जन्मभूमी आहे आणि किष्किंदा येथील अंजनाद्री ही त्यांची कर्मभूमी होती. वाल्मिकी रामायणात भगवान हनुमानाचे जन्मस्थान गोकर्णात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
नेमका दावा कोणाचा खरा ठरणार हे येणार काळ सांगेलचं तोपर्यंत सगळ्यांना हनुमानासारखी शक्ती मिळो ही शुभेच्छा !
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?