‘आर्मीत सैनिकांना टिटवीची अंडी खायला देतेत म्हणजे त्यांना झोप येत नाही. ‘लहानपणी आमच्या गल्लीतला एक शहाणा आम्हाला लहानपणी हे सांगायचा आम्हाला पण खरं वाटायचं. मग काय भेटलं त्याला टिटवीची अंडी खात जा म्हणायचो. घरी टिटवीचा विषय काढला कि म्हणायचे त्या अपशकुनी पक्षाबद्दल कशाला बोलतो. एखाद्याच्या घरावरून टिटवी आवाज करत गेली कि काहीतरी अपशकून होणार अशी चर्चा सुरु व्हायची. आजही काही लोकांना टिटवीचा आवाज भेसूर वाटतो. पण एक फायद्याची अफवा माणसांनी शोधून काढली ती अशी कि टिटवीजवळ पारस मणी असतो. त्यामुळे काही जण एक दिवसात श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून टिटवीजवळ लोखंड ठेवतात. आता या लोखंडाचे सोनं किती जणांचं झालं हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या सगळ्या अफवा किती खऱ्या किती खोट्या नीट समजून घेऊ.
टिटवीची अंडी खाल्ल्याने झोप नाहीशी होते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. तरीही एखाद्याला प्रयोग करायचा असेल तर टिटवीची अंडी तरी मिळतेत का बघा. चुकून एखाद्याने टिटवीच्या अंड्याला हात लावला तर टिटवी सोडणार नाय. टिटवी एक जिगरबाज पक्षी आहे. तुम्ही तिच्या अंड्यांना हात तर लावून दाखवा…?
टिटवी हा पक्षी केवळ आपल्या ओरडण्यासाठी बदनाम आहे. परंतु टिटवीचे ओरडणे हे मोठे रंजक शास्त्र आहे. तिच्या ओरडण्यातून अपशकुन होत नाही तर तिच्या पिल्लांचं संरक्षण होतं. आपले पण आई बाप मुलांवर संकट आलं तर धावपळ करतात कोणाला तरी मदतीसाठी आवाज देतात तसंच टिटवीचं आहे. टिटवीच्या जोडप्याचे आपल्या अंड्यांवर अतोनात प्रेम असते. त्यामुळे हा पक्षी झाडाची सावलीही आपल्या अंड्यांवर पडल्याचे सहन करीत नाही. नदी परिसर, ओसाड माळराने, मैदाने आणि निर्जन डोंगरांवर या पक्ष्यांचा अधिवास असतो. कारण झाडावर घर बंधने टिटवीला शक्य नाही तिच्या पायांची विशिष्ट रचना असल्याने ती जमिनीवरच राहते.
जमिनीवर खड्डा खोदून टिटवी त्यात आपली अंडी घालते. या घरट्याजवळ साप, कोल्हा, लांडगा, मुंगूस किंवा माणूस असा कोणताही प्राणी आल्यास टिटवी जिवाच्या आकांताने विलाप सुरू करते. दुसरी टिटवी घरट्याच्या दूर पंख मोडल्याने फडफडत असल्याचे नाटक करते. त्यामुळे शत्रू प्राण्याचे लक्ष विचलित होते. तो प्राणी जखमी असल्याचे नाटक करणार्या टिटवीच्या दिशेने जातो. त्याला भुलवत भुलवत ती घरट्यापासून दूर घेऊन जाते. एवढी कला या इवल्याशा पक्ष्याच्या ठायी असते. या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम साधारणपणे मार्च ते ऑगस्टमध्ये असतो. मादी एकावेळी ३ ते ४ राखाडी किंवा राखाडी-तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली अंडी देते. अंड्यांसाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ अंड्यांच्याच रंगांच्या गारगोट्या हा पक्षी गोळा करतो. त्यामुळे अंडी लवकर दिसत नाही. अंड्यातून बाहेर पडलेली पिल्लं दोन दिवसातच तुरूतुरू धावू लागतात. पिल्लं धावायला लागली कि टिटवी सांकेतिक आवाजातून तिच्या पिल्लाना सतत सतर्क करत असते. आपल्या पालकांच्या ओरडण्यातून संकेत मिळताच पाय दुमडून ही पिल्लं जमिनीशी एकरूप होऊन जातात. त्यामुळे शत्रू प्राण्याला त्यांच्या असण्याची थोडीही चाहूल लागत नाही. तो प्राणी दूर जाताच पुन्हा ही पिल्लं चालू लागतात. माळरानावर याचकारणामुळे टिटवी सतत ओरडताना दिसते. तिच्या ओरडण्याचा हा अर्थ समजून घेतला तर यापुढे टिटवी अपशकुनी वाटणार नाही.
टिटवीचा आवाज कर्कश, भेसूर नसतो तो काळजी करणाऱ्या पालकांसारखा आवाज आहे. पिल्लांना उष्णता लागू नये म्हणून टिटवी छाती ओली करून पिलांच्या डोक्यावर ठेवते. प्रेम, माया, काळजी यापेक्षा वेगळी काय असते?
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?