MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

स्मशानातील पाखरे टोचे मारून सांगत होते, “इथं कुठं अडकून पडते सिंधू जग तुझी वाट पाहतंय.”

Sindhutai Sapkal life story

नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी गरोदर सिंधू ताईंना घरातून हाकलून दिले. गावातल्याच एका बैलाच्या गोठ्यात सिंधुताईंनी मुलीला जन्म दिला. बाळ जन्माच्या वेळी मदत करायला कोणीही नव्हते तरीही देवाच्या कृपेने मुलीची तब्येत ठीक होती. मुलगी वाचली होती. आणि आता पर्यंत सगळे अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या एकट्या सिंधूने ताईच्या आयुष्यात मुलीची भर घातली गेली. संघर्ष वाढला होता. स्वतः सोबत मुलीला पण वाचवायचे होते, जगवायचे होते.

घराचे दरवाजे बंद झाले होते. मुलीला घेऊन कोणाकडे घेऊन जावे असे कोणीही उरले नव्हते. मग सुरु झाला सिंधू ताईंचा स्मशानातला संघर्ष. गावात आसरा मिळत नाही म्हणून सिंधू ताई जवळच्या शहरात आल्या. दिवसभर मुलीला घेऊन शहरात फिरल्या, मिळेल त्याला भीक मागितली. दिवस संपला, रात्रीची चाहूल लागली होती. अंधार वाढत होता. जो पर्यंत सूर्य आहे तो पर्यंत कोणाच्या सोबतीची गरज लागत नाही पण अंधारात कुठं राहावे, रात्र भर मुलीला कुठे आसरा द्यावा चिंतेत सिंधू ताई होत्या. माणसं मदत करायला हात आकडते घेतात पण देवाला सगळयांची काळजी असते. देवाने सिंधू ताईला वाट दाखवली. ज्या रस्त्यावर मुलीला घेऊन सिंधू ताई बसल्या होत्या तिथून एक प्रेत यात्रा जात होती. प्रेत गरिबाचे असावं कारण प्रेतयात्रेत जास्त लोक नव्हती. सिंधू ताईच्या डोक्यात आलं आपल्याला राहायला स्मशान एकदम ठीक जागा आहे. तिथून कोणीही आपल्याला हाकलून देणार नाही. स्मशानातच राहायचा निर्णय पक्का केला आणि सिंधू ताई प्रेत यात्रेच्या मागे मागे जाऊ लागल्या.

प्रेतयात्रेसोबत सिंधू ताई स्मशानात पोहचल्या. अंत्यविधी उरकला जात होता. कोणी आपलाच माणूस मेला असल्यासारखं सिंधू ताई सगळा विधी बघत होत्या. विदर्भांत एक प्रथा आहे स्मशानात आलेल्या सगळ्यांना विसावा देतात. विसावा म्हणजे काय तर भाकरीचे पीठ देतात. मृताच्या घरच्यांनी सिंधुताईंना पण विसावा दिला. सिंधू ताईने विसावा घेतला आणि अंत्यविधी बघत राहिल्या.
विधी संपला, प्रेताच्या घरचे स्मशानातुन परत गेले. सिंधू ताईंना कोण म्हणणार होत चल म्हणून? तिला हाक मारणारे तिथे कोणीही नव्हते. अख्या स्मशानात जळणारे प्रेत, सिंधू ताई आणि तिचं लहान बाळ हे तिघेच उरले होते. जळणाऱ्या प्रेताकडे बघून सिंधू ताईला सुरेश भटांची कविता आठवत होती.
इतकेच मला सरणावर जाताना कळले होते ,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
मी एकटाच त्याच रात्री आशेने तेवत होतो,
आणि सारे आकाश उजळले होते.

सिंधू ताईंना स्मशान शांतता कशाला म्हणतात याचा अनुभव येत होता. भीतीने मन हलून गेले होते. स्मशानात रात्र कशी जाईल याची चिंता मन स्थिर होऊ देत नव्हती. दिवसभर फिरून फिरून पाय थकले होते. पोटात कावळे आवाज करत होते. जेवायला कोणीही देणार नव्हतं. तेंव्हा सिंघूताईने घेतलेला विसावा काढला ज्यात भाकरीचे पीठ होते. जळणाऱ्या प्रेताच्या आगीवरच भाकर भाजली. आणि एखाद्याला खूप दिवसांनी जेवायला मिळाल्यागत त्या भाकऱ्या संपवल्या.

प्रेताचा डोकं फुटलं होत. त्या आवाजाने आजूबाजूचे पाखरे स्मशानात आले. स्मशानातुन माणसे गेली कि पाखरे स्मशानात यायचे आणि जे मिळेल ते खायचे पाखरांचे नेहमीचेच काम. पण आज त्यांना एक हतबल बाई स्मशानात दिसत होती. पाखरे विचार करत असावेत ही इथं काय करतेय ? पाखरांच्या घोळक्याने सिंधुताईवर हल्ला चढवला, मुलीला पदराच्या आड लपवून ताई पाखरांचा सामना करत होती. त्या वेळेला स्मशानातं थांबायची पाखरे शिक्षा देत होते. पाखरांच्या टोच्यामुळे ताई घायाळ झाल्या आणि त्यांच्या लक्षात आले कि पाखरे आपल्याला सांगायचं प्रयत्न करत आहेत, “सिंधू लाखो लोकांना तुझ्या सारखंच दुःखाला सामोरे जावे लागत आहेत, तुझी त्यांना गरज आहे. त्यांना हाक दे, मदत कर. इथं काय अडकून पडली आहे जग तुझी वाट पाहताय तू इथून चालती हो सिंधू “.
सिंधू ताईंनी ती शेवटची रात्र स्मशानात घालवली आणि ताई तिथून निघाल्या. पुढच्या काळात लाखो अनाथांच्या माई झाल्या, आई झाल्या.

काल रात्री सिंधू ताई आपल्यातून निघून गेल्या पण सुरेश भट म्हणतात तसे मायी आज सरणावर नक्की गेल्या आहेत.पण आज त्या एकट्याच आशेने तेवत आहेत आणि त्यांनी सारे आसमंत आपल्यासाठी उजळून ठेवले आहे.अनाथांच्या माईला भावपूर्ण श्रद्धांजली.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.