MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महागाईच्या वाढीमुळे पोल्ट्री व्यवसाय तोट्यात, अंडे अन चिकन महागणार

आज काल महागाई, महागाई आणि महागाई याच्या पलीकडे बातम्यांमध्ये दुसरं काहीही नसतं. पेट्रोल, डिझेलच्या भावापासून महागाई सुरु होते आणि ती पार कांदा, टोमॅटो आणि खायच्या वस्तूपर्यंत येते. खायच्या वस्तूंचे भाव वाढले कि काय सहन करावं लागत हे सांगायची गरज नाही. या वर्षीच्या महागाई मध्ये तर अजब झाले आहे. कोंबड्या आणि पोल्ट्री व्यवसायाला देखील प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात अंडे आणि चिकनचे भाव वाढू शकतात. या वर्षीच पोल्ट्री व्यवसायाला महागाईचा का फटका बसला आणि चिकन अंड्यांचे भाव का वाढू शकतात हे आपल्याला माहिती पाहिजे. महागाई, अंडे चिकनचे भाव यांच्या सोबत पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न देखील समजून घेणे गरजेचे आहे.

कोंबड्यांच्या खाद्याची भाव वाढ झाली आहे

अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या खाद्यासाठी मका, सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुसा, मासळी, शिंपले आणि इतर अन्नांचा वापर केला जातो. हे सर्व खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रति किलो २८ रुपयांपर्यंत खर्च येतो. मागील काही दिवसांपासून प्रति किलो मागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. खाद्य तयार करण्यासाठी मका २५ रुपये, सोयापेंड ६६ रुपये, शेंगपेंड ५२ रुपये, तांदूळ भुस्सा २० रुपये, मासळी ४० रुपये आणि शिंपले ६० रुपये किलो दराने मिळत आहेत. एकूण खाद्याच्या दरात ६०-७० टक्के वाढ झाली आहे. म्हणूनच पोल्ट्री व्यवसाय सध्या तोटय़ात सुरू आहे. दहा हजार कोंबड्यांमागे रोज २० हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय करतात

महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात निव्वळ पोल्ट्री फार्म आहेत. बहुतेक पोल्ट्री फार्म हे शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून टाकलेले असतात. पोल्ट्री व्यवसाय फारसा खात्रीचा वाटत नाही. कधी कधी रोगराही आल्यावर सर्व पोल्ट्री फार्म बरबाद होऊ शकतो. त्यामुळेच बहुतांश शेतकरी पोल्ट्रीला जोड व्यवसाय म्हणून करतात. पोल्ट्री उद्योगावर राज्यातील हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. अनेक लोकांना पोल्ट्रीत आणि चिकन सेंटरवर रोजगार मिळतो.
मका, गहू, सोयाबीनचाच अनेक शेतकरी खाद्य म्हणून वापर करतात. पण यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन वाया गेले आहे. बाजारात सोयाबीनचे दर साडेसात हजार रुपये क्विंटलच्या वर गेले आहेत. मकाही २७०० रुपये क्विंटलवर गेला आहे. भारतात पोल्ट्रीच्या खाद्याची कमतरता आहे. खाद्य बाहेर देशातून आयात करताना पण खूप अडचणी येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्थरावर अनेक समस्या चालू आहेत. रशिया, युक्रेन आणि बेलारूस सारखे देश पोल्ट्रीच्या खाद्याची सर्वात जास्त निर्यात करतात पण रशिया आणि युक्रेन या दोन देशात सध्या युद्ध चालू आहे. त्यामुळे उरतो फक्त बेलारूस तर त्या देशातून पण ज्या प्रमाणात आपल्याला आयात करायला पाहिजे त्या प्रमाणात होत असल्याचं दिसत नाहीये. भारतातले उत्त्पन्न वाढवल्याशिवाय ही समस्या सुटेल असं वाटत नसल्याचं अनेक जाणकार मत व्यक्त करत आहेत.

पोल्ट्री हजारो कोटींचा व्यवसाय आहे

अंड्याच्या उत्पन्नात चीन, अमेरिका यांच्या नंतर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात दर रोज एक कोटी अंड्याचे उत्पन्न होते. वाढत्या मागणीमुळे भारतात मागच्या दोन वर्षात पोल्ट्री व्यवसाय खूप वाढला आहे. २०२०-२०२१ या वर्षात पोल्ट्री व्यवसायाची उलाढाल दोन लाख कोटी होती. भारतातले अंडे जगाच्या बाजारात निर्यात केले जातात. विशेष करून आखाती देशांमध्ये भारतीय अंड्यांना मागणी प्रचंड आहे. दुबई ,इराण आणि ओमान मध्ये भारतीय पोल्ट्रीची चालती आहे.
२०२१-२२ च्या देशाच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार देशात २०१४-१५ मध्ये ७८.४८ अब्ज अंडी उत्पादन होत होते. २०२०-२१ मध्ये ते १२२.११ अब्जावर गेले आहे. २०२२ मध्ये दरडोई दर वर्षी देशात ९१ अंडय़ांचे उत्पादन होत आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वाना प्रोटिन्सची गरज असते. कमी खर्चात अंडे आणि चिकन प्रोटिन्सची गरज पूर्ण करतात. त्यामुळे भारतात अंड्यांची मागणी दर रोज वाढत आहे. भारतीय पोल्ट्री व्यासायिकांनी देशातली सर्व मागणी पूर्ण करून २०२१ मध्ये १ लाख कोटींचा व्यवसाय भारताच्या बाहेर केला आहे.

पोल्ट्री व्यवसायासाठी पुढचा काळ आव्हानाचा असणार आहे

महागाई लवकर कमी होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे खाद्यांची किंमती कमी होणार नाहीत. व्यवसाय चालवायचा असल्यास अंडे आणि चिकन यांच्या भावात वाढ केल्याशिवाय पोल्ट्री व्यवसाय चालवणे व्यावसायिकांना अवघड जाणार आहे. पण जर भाव वाढ केली तर बाजारात मागणी कमी होऊ शकते आणि मागणी कमी झाली तर मात्र व्यवसाय अडचणीत येऊ शकतात. पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी सध्या खूप अडचणीत सापडले आहेत. भाव वाढ करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आणि ग्राहक त्यांची परिस्थिती समजून घेतील कि नाही या बद्दल बाजारातील जाणकार साशंक आहे.
जोपर्यंत बाजारात खाद्याचे भाव कमी होणार नाहीत तो पर्यंत अंडे आणि चिकनचे भाव वाढतच राहणार आहेत. जून-जुलै मध्ये भारतीय खाद्य बाजारात आले कि अंडे आणि चिकनचे भाव आपोआप कमी होतील.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.