MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चंद्रकांत पाटील म्हणजे वाढीव नेता, पण तेवढाच त्यांचा संघर्ष मोठा आहे

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक झाल्यापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. कोल्हापूर मधून जर हरलो तर हिमालयात जाईल अशी गर्जना त्यांनी केली होती पण काँग्रेसच्या बंटी पाटील यांनी चंद्रकांत दादांनी दिलेल्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. कोल्हापुरात भाजपचा पराभव झाल्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. एक दोन दिवस शोशल मीडिया वर चंद्रकांत पाटील यांचे मिम चालत होते की चंद्रकांत पाटील हिमालयात गेले म्हणून.

चंद्रकांत पाटील पण काय ट्रॉलर्सना घाबरले नाहीत. हिमालयाच्या प्रकरणावर पत्रकारांनी त्यांना विचारल असता त्यांनी सांगितलं कि ‘ मी असं बोललो होतो कि जर मी स्वतः कोल्हापूरमधून हरलो तर हिमालयात निघून जाईल.
या सर्व घटना बघितल्या कि एक गोष्ट मात्र जाणवते कि चंद्रकांत पाटील यांच्या भूमिका तुम्हाला पटत असो कि नाही पण एक गोष्ट तुम्हाला मान्यच करावी लागेल कि चंद्रकांत पाटील हे वाढीव नेते आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास कसा राहिला आहे हे एकदा बघणे बनतच. तो आपण प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचा जन्म प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई इथंला. त्यांचं शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालय दादर आणि महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज इथं झालं. दादा किंवा चंद्रकांत दादा नावाने ओळखले जाणारे पाटील मुळचे कोल्हापूरचे असले तरी त्यांचे आई-वडील गिरणी कामगार असल्यामुळे ते मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचं सर्व शिक्षण मुंबईतच पूर्ण झालं.

अभाविप ते प्रचारक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) यशवंतरावजी केळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या कामास सुरुवात केली. ऑगस्ट 1980 रोजी जालन्याच्या प्रचार अभ्यासवर्गात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषणा करण्यात आली. यानंतर जळगाव जिल्ह्यात अभाविपचं काम वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

चलो काश्मीर मोहीम

1990 मध्ये अभाविपच्या वतीने काश्मीर प्रश्नावर देश पातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी ‘चलो काश्मीर’ नावाने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गतच सुमारे 20 हजार तरुण श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाणार होते. या मोहिमेचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम

त्यानंतर चंद्रकांत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. 1995-99 अशी 4 वर्षं त्यांच्याकडे रा. स्व. संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. 1999-2004 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात त्यांच्याकडे महत्वाची भूमिका होती.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

सतत 13 वर्षं पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करणारे दादा पाटील हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थेत जानेवारी 1994 ते एप्रिल 2000 पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते. एप्रिल 2000 ते मार्च 2013 पर्यंत दादांकडे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सचिवपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती.

भाजपमध्ये संधी

2005 मध्ये चंद्रकांत पाटील राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सन 2004-2005 या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली. 2007-2010 भाजप प्रदेश सरचिटणीस, तर सन 2010-2015 पर्यंत त्यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. जुलै 2019 पासून चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत.

पदवीधर मतदारसंघातून राजकारणात प्रवेश

2008 मध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना दिली. 2014 मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा संधी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन झाल्यावर या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली. मंत्रिमंडळात समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला.

कोथरुडमधून विधानसभेत

जुलै 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा विजय झाला. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना आपला मतदारसंघ चंद्रकात पाटील यांना द्यावा लागल्यामुळे झालेलं दुःख लपवता आलं नव्हतं. चंद्रकांत पाटील यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर ‘बाहेरचा उमेदवार’ अशी टीका झाली होती.

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे की पुण्याचे ?

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत की मुंबईचे हा वाद नेहमीच उभा केला जातो. चंद्रकांत पाटील ना कोल्हापूरचे नाही पुण्याचे आहेत. जन्माने ते मुंबईकर आहेत. “चंद्रकांत पाटील मुंबईचे आहेत. त्यांचा जन्मही मुंबईत झाला आणि जडणघडणही तिकडच झाली. त्यांचे वडील मात्र कोल्हापूरच्या खानापूरचे. चंद्रकांत पाटील यांचं टेलिमॅटिक्स व्यवसायापुरतं कोल्हापूरशी नातं आहे. कोल्हापूरच्या दक्षिण भागात त्यांचा बंगला आहे. विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर मधून उभं राहायचं याची चर्चा सुरू होती, तेव्हा मी कोल्हापूरचाच आहे, असं सांगत होते” पाटील यांचे वडील गिरणी कामगार असल्यामुळे मुंबईला गेले. मग मुंबईतच त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्या घडणीशी कोल्हापूरचा काही संबंध नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.